इंदापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पुण्यातील जाहीर सभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या केलेल्या टीकेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नरेंद्र मोदी यांना ४ जूनला मतमोजणीनंतर लक्षात येईल की, पवार साहेब हे महाराष्ट्राचा आत्मा आहेत, असा पलटवार जयंत पाटलांनी केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ इंदापुरातील सणसर इथं सोमवारी आयोजित सभेत ते बोलत होते.
नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करताना जयंत पाटील म्हणाले की, आता काही वेळापूर्वी पंतप्रधान मोदींची सभा झाली. त्या सभेत त्यांनी पवार साहेबांना आत्म्याची उपमा दिली. पण नरेंद्र मोदी यांना ४ जूनला मतमोजणीनंतर लक्षात येईल की, पवार साहेब महाराष्ट्राचा आत्मा आहे. आदरणीय पवार साहेबांवर बोलण्याव्यतिरिक्त या पंतप्रधानांना काहीच जमत नाही.
आपलं काम सांगायचं तर पंतप्रधान जाईल तिथे विरोधकांवर टीका करत आहेत. आम्ही अनेक पंतप्रधान पाहिले पण कोणत्याही पंतप्रधानाने विरोधकांवर अशी टीका केली नाही. हे नरेंद्र मोदी यांना शोभतंय असं वाटत नाही. ही निवडणूक खूप वेगळी आहे, सत्ताधा-यांना काहीही करून ही निवडणूक जिंकायची आहे. म्हणून साम दाम दंड भेद सर्व गोष्टींचा वापर होत आहे. त्यांच्या घौडदौडीला शरदचंद्र पवार साहेब लगाम लावत आहेत. म्हणून ते सतत पवार साहेबांवर टीका करत आहेत, अशा शब्दांत पाटील यांनी मोदींनी उत्तर दिलं.
४०० पार करू असे सांगणा-या नरेंद्र मोदींच्या तोंडून आता ४०० हा शब्द देखील निघत नाही. कारण त्यांना कळून चुकले आहे की, त्यांच्या आता २०० वरही जागा येत नाही, असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला आहे.