परभणी : खेती बचाओ अभियान हे केवळ जनजागृती अभियान नसून देशाच्या अन्नसुरक्षा व शाश्वत कृषी विकासाशी निगडित राष्ट्रीय चळवळ आहे. जमिनीची सुपीकता जपणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापनासह हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. शेतक-यांनी वैज्ञानिक तंत्रज्ञान, आधुनिक कृषी संशोधन आणि विद्यापीठाच्या शिफारशींचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होईल, असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कायार्नुभव (रावे) कार्यक्रमांतर्गत खेती बचाओ अभियान सूरपिंपरी येथे दि. ५ जून रोजी कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले.
यावेळी कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी खेती बचाओ अभियान अंतर्गत मृदा संवर्धन, जलसंधारण, सेंद्रिय पदार्थांचा वापर, पीक विविधीकरण, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा प्रसार करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे. त्यामुळे प्रत्येक शेतक-याने मृदा वाचवा, पाणी वाचवा आणि शेती वाचवा हा संदेश आत्मसात करून पुढील पिढ्यांसाठी शेती समृद्ध ठेवण्याचे आवाहन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी शेतक-यांना कमी पाण्यावर शेती नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी केले. मृदाशास्त्र विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी माती परीक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले.
यशस्वीतेसाठी डॉ. बी. एम. कलालंबडी, डॉ. आनंद दौंडे, डॉ. सचिन पव्हणे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख, डॉ. आशा सातपुते, सूरपिंपरी येथील जगन्नाथ पवार, सर्जेराव पवार, श्रीराम जाधव, कपिलराव धुमाळ, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती होनराव, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती शिंदे, सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. समारोपप्रसंगी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी ऋतुजा खंदारे व वैष्णवी शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन सुरत साठे यांनी मानले
















