शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील साकोळ ते तिपराळ रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून रस्त्यावरील खडी उघडी पडल्याने प्रवास करणे कठीण झाले आहे.या साकोळ ते तिपराळ रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून प्रवाशी, नागरिकांतून गैरसोय टाळावी,अशी मागणी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय शिरूर अनंतपाळ यांच्याकडे करण्यात आली आहे. साकोळ येथून तिपराळ, शेंद, कानेगावकडे जाण्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्वाचा असून या रस्त्याची अत्यंत दुरावस्था होवून दहा वर्ष झाली मात्र या रस्त्याची एकदा ही साधी डागडूजीदेखील झाली नसल्याने वाहनधारक, प्रवाशी व नागरिकांची गैरसोय होत आहे. दरम्यान शिरूर अनंतपाळ ते साकोळ मुख्य रस्त्यावरून तिपराळला रस्ता जातो.तिपराळ सह शेंद व कानेगाव ग्रामस्थांचा दैनंदिन व्यवहार हा शिरूर अनंतपाळ शहरासह साकोळ गावांशी संलग्न आहे.
तालुक्याची ठिकाणी व साकोळ येथे बँकेचे व्यवहार, प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार व बाजार करण्यासाठी या भागातील नागरिकांना दररोज ये जा करावी लागते मात्र साकोळ गावांतून तिपराळ पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांना प्रवास करणे कठीण जात आहे. खडी उघडी पडली तर रस्त्यात खड्डे पडल्याने वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहेत. तर नागरिकांना पायी चालणे देखील कठीण झाले आहे.
अत्यंत दुरवस्था झालेल्या या साकोळ ते तिपराळ रस्त्याची दुरवस्था पाहता या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून ग्रामस्थांची सोय करावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम उपविभाग शिरूर अनंतपाळ यांच्या सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव पाटील, माजी सभापती गोंिवदराव चिलकुरे, तिपराळचे उपसरपंच मारोती वाकरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.