मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने वातावरणात होणा-या बदलांविषयी निर्वाणीचा इशारा दिला आहे. आज देशातील ५७ टक्के जिल्हे पर्यावरण बदलामुळे होणा-या जबर हानीच्या काठावर आहेत.
राज ठाकरे नेहमीच पर्यावरणाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतात. प्रसंगी ते सरकारला आव्हान देत, वन्यजीव संरक्षण, वृक्षतोड, प्रदूषण नियंत्रण व पाणी-जमीन संरक्षणासारख्या मुद्यांवर तीव्र शब्दांत टीका करतात. त्यांच्या या भूमिकेमुळे केवळ सरकार दबावात येत नाही तर सामान्य नागरिकांमध्येही पर्यावरणीय जागृती वाढण्यास मदत होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी आजच्या जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा विकासाच्या नावाखाली होणा-या पर्यावरणाच्या -हासावर बोट ठेवले आहे.
देशातील ५७ टक्के जिल्हे आज पर्यावरण बदलामुळे होणा-या जबर हानीच्या काठावर आहेत. आपण जिथे राहतो तिथे ८ महिने आपल्याला धड जगताही येत नाही याची खंत आपल्याला वाटत नाही का? असा जळजळीत प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, आज जागतिक पर्यावरण दिन. मागच्या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि आजपर्यंतचा उच्चांकी उन्हाळा जो सगळ्यांनी सहन केला या पार्श्वभूमीवर आजच्या जागतिक पर्यावरण दिवसाकडे आपण नेहमीच्या उपचारांच्या पलीकडे जाऊन बघायला हवं.
आपल्याकडे सगळ्याच बाबतीत उत्सवी उत्साह असतो. त्यामुळे पर्यावरण दिन आला की झाडं लावून त्याचे फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकणे याचा अतिउत्साह असतो आणि त्यातली ९० टक्के झाडं पर्यावरणदिनाच्या संध्याकाळपर्यंत पण टिकत नाहीत. त्यात काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने काही कोटी झाडं लावण्याची आणि पुढे ती लावून झाली अशी घोषणा केली. ती झाडं कुठे आहेत हे सरकारलाच माहीत. असो. पण आजच्या दिवशी तरी सरकारने आणि महाराष्ट्रातील लोकांनी आपण या पर्यावरण बदलाने काय गमावलं आहे आणि काय गमावणार आहोत याचा विचार करायला हवा.
२०१४ साली मी जेव्हा महाराष्ट्राचा विकास आराखडा सादर केला होता तेव्हा मी फिल्म सादर केली होती. विकासाला सौंदर्याची आणि पर्यावरणाच्या विचाराची जोड नाही दिली तर तो विकास किती वरवरचा आणि पोकळ असतो हे मी त्यात सांगितलं होतं. त्याची साक्ष गेल्या काही वर्षांत तुम्हाला जाणवत असेल. अमुक रस्ता बांधला, तमुक ब्रिज बांधला म्हणून श्रेय घेण्याची आणि ते पाहून खुश होण्याची स्पर्धा सुरू आहे. पण एका पावसाने, तो सुद्धा मान्सूनचा पाऊस नाही, शहराची दाणादाण उडत आहे. आता परवा एका ठिकाणी बातमी वाचली की या उन्हाळ्यात शेतात सकाळी १० नंतर काम करायला जायला महिला-पुरुष धजावत नव्हते. याचा अर्थ आपण लावणार आहोत का?
















