चेन्नई : दाक्षिणात्य राजकारणात भारतीय जनता पक्षाचा प्रमुख चेहरा मानले जाणारे तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. अन्नामलाई यांनी केवळ अध्यक्षपदच नव्हे, तर पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला असून पक्षाने तो मंजूर केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी अन्नामलाई यांचा राजीनामा तात्काळ प्रभावाने स्वीकारला असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, के. अन्नामलाई आता भारतीय जनता पक्षाचे प्राथमिक सदस्यही राहिलेले नाहीत. हा राजीनामा मंजूर होण्यापूर्वी दिल्लीत भाजपच्या शीर्ष नेत्यांमध्ये प्रचंड खलबते आणि हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अन्नामलाई यांनी २ जून रोजी दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांची भेट घेऊन ५ पानांचे राजीनामा पत्र सुपूर्द केले होते. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एक अत्यंत गोपनीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात पक्ष सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती.
या बैठकीनंतर अन्नामलाई तमिळनाडूला परत जाण्यासाठी दिल्ली विमानतळावर पोहोचले होते. ते विमानात बसणार इतक्यात भाजपकडून त्यांना अचानक फोन करून परत मुख्यालयात बोलावण्यात आले. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा आणि निर्णय बदलण्याचा शेवटचा प्रयत्न केला, परंतु अन्नामलाई आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. अखेर पक्षाला त्यांचा राजीनामा स्वीकारावा लागला.
…म्हणून अन्नामलाईंनी सोडली भाजप?
कर्नाटक कॅडरचे माजी आयपीएस अधिकारी असलेले के. अन्नामलाई हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याने प्रभावित होऊन राजकारणात आले होते. अल्पावधीतच त्यांनी तमिळनाडूचे उपाध्यक्ष आणि नंतर थेट प्रदेशाध्यक्षपद भूषवले. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामागे खालील प्रमुख कारणे असल्याचे समोर येत आहे.
राज्यसभेचे तिकिट नाकारले
भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या यादीत नाव न आल्यामुळे अन्नामलाई नाराज होते. त्यांना आंध्र प्रदेशातून राज्यसभेवर पाठवण्याची चर्चा होती, मात्र ऐनवेळी भाजपने आपल्या कोट्यातील जागा तेलुगु देसम पक्षाला दिली. पक्षांतर्गत बाजूला पाडण्याचा प्रयत्न: अन्नामलाई यांनी आपल्या ५ पानांच्या राजीनामा पत्रात तमिळनाडू भाजपमध्येच त्यांना ‘साईडलाईन’ (बाजूला) केले जात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे.
एआयएडीएमके सोबतच्या युतीला विरोध
विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुक पक्षासोबत केलेल्या युतीमुळे भाजपच्या मतांची टक्केवारी घटली आणि राज्यातील पक्षाची ताकद कमी झाली, असा आक्षेप त्यांनी पत्रात नोंदवला आहे.
सोशल मीडियावरून समर्थकांशी साधणार संवाद
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, के. अन्नामलाई आता तमिळनाडूच्या राजकारणात कोणत्याही मोठ्या पक्षाच्या कुबड्यांशिवाय एकले चलो रे या भूमिकेतून स्वतंत्रपणे पुढे जाण्यास उत्सुक आहेत. आज दुपारी १२ वाजता ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या लाखो समर्थकांशी संवाद साधणार असून, त्यात ते आपल्या पुढील राजकीय प्रवासाची अधिकृत घोषणा करण्याची दाट शक्यता आहे.
















