केरळात आनंदसरी !

देशभरातील नागरिकांना प्रतीक्षा असलेला नैऋत्य मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) अधिकृतपणे केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा केली आहे. गत काही दिवसांपासून मान्सूनच्या आगमनाबाबत विविध अंदाज व्यक्त केले जात होते. सुरुवातीला २६ मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज होता. त्यानंतर १ किंवा २ जूनपर्यंत आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, काही दिवसांचा विलंब झाल्यानंतर अखेर ४ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. हवामानतज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि अरबी समुद्रातील सक्रिय मोसमी वा-यांमुळे मान्सूनच्या प्रगतीला मोठी चालना मिळाली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगांची घनता वाढली असून त्यामुळे मान्सूनला पुढे सरकण्यासाठी आवश्यक वातावरण तयार झाले. अरबी समुद्रातही आर्द्रतेचे प्रमाण वाढले असून, मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. या वा-यांमुळे केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाला मदत झाली असून पुढील वाटचालीसाठी ही परिस्थिती अनुकूल मानली जात आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रातही हवामानात बदल जाणवू लागला आहे.

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषत: सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. हा पाऊस मान्सूनचा नसून मान्सूनपूर्व स्वरूपाचा असेल. वातावरणातील वाढलेली आर्द्रता आणि सक्रिय मोसमी वा-यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १० जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तर १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात बरसू शकेल अशी अपेक्षा होती. परंतु यंदा केरळमध्येच मान्सून काही दिवस उशिरा पोहोचल्याने महाराष्ट्रातील आगमनाच्या तारखांमध्ये बदल होणार का ते पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. हवामान विभागाने जारी केलेल्या पर्जन्यमान नकाशामध्ये दक्षिण भारतातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता दर्शवण्यात आली आहे तर उत्तर भारतातील मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात तुलनेने कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने काही राज्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत. हवामानातील बदलांसाठी सतर्क राहण्याचा इशारा म्हणजे यलो अलर्ट. ऑरेंज अलर्ट म्हणजे अधिक गंभीर परिस्थितीची शक्यता.

यामध्ये जोरदार पाऊस, वादळी वारे, मेघगर्जना किंवा विजांचा कडकडाट होऊ शकतो. हवामान विभागाचे माजी अधिकारी होसाळीकर यांनी ४ जून रोजी दिलेल्या माहितीनुसार केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टी आणि दक्षिण कोकण भागात पुढील पाच ते सहा दिवसांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. अखेर केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याने देशभरातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातही पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्हे दिसत आहेत. एक-दोन दिवसांत राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मुंबई, घाटमाथा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून २-३ दिवसांत महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे. राज्यात मान्सूनपूर्व पावसाचे धुमशान सुरू आहे. कोकण आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांत वादळी वारा आणि विजांसह पाऊस होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर कायम राहील. २४ जिल्ह्यांना यलो तर ३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण विभागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत असून तापमानात एक ते दोन अंशाची घट झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात तुरळक ते हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. लातूर, धाराशिव परिसरात ताशी ५० किमी वेगाने वारे वाहून विजांसह पावसाचा अलर्ट आहे. शेतक-यांना शेतीची प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे. कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतक-यांना आणि लोकांना आवाहन करण्यात येत आहे की, संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. शेतक-यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये. विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी व शेतक-यांनी स्वत:ची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता पहावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफार्मर, विजेचे खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे.

सध्या पडणारा पाऊस नियमित मान्सूनचा समजून शेतक-यांनी शेतीकामांना सुरुवात करू नये. जर शेतक-यांनी अपु-या ओलाव्यावर पेरणी केली तर बियाणे वाया जाण्याची आणि पर्यायाने दुबार पेरणीचे मोठे आर्थिक संकट ओढवण्याची दाट शक्यता आहे. यंदाच्या मान्सून हंगामात एल निनोची परिस्थिती निर्माण होऊ शकते. सरासरीपेक्षा कमी पावसाच्या अंदाजामागील एक प्रमुख कारण म्हणजे जुलै महिन्यानंतर एल निनोची परिस्थिती सक्रिय होणे हे आहे. याचा परिणाम ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पावसावर होऊ शकतो. रोहिणी नक्षत्रात पाऊस पडला तर खरीप हंगाम चांगला जातो अशी शेतक-यांची श्रद्धा असते. बहुतेक शेतक-यांची नांगरणी झाली आहे, शेणखत टाकून झाले आहे, आता फक्त पावसाची वाट बघणे सुरू आहे. पाऊस वेळेवर झाला तर कापूस, सोयाबीनची पेरणी करण्यास ते तयार आहेत. शेतक-यांनी प्रमाणित बियाणेच वापरावे. पेरणीची घाई करू नये. जमिनीत पुरेशी ओल झाल्यावरच पेरणी करावी असे आवाहन कृषी अधिका-यांनी केले आहे. सध्या सोयाबीन, कापूस, तूर पिकांच्या बियाणांना मागणी आहे. ब-याच ठिकाणी पाणीसाठ्याची स्थिती मात्र चिंताजनक आहे. अनेक लहान-मोठ्या प्रकल्पांतील पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे वेळेवर चांगला पाऊस होणे गरजेचे आहे. ८ जूनपासून मृग नक्षत्र सुरू होणार असून त्याचे वाहन ‘बेडूक’ असल्याने चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06

Latest news