लातूर : प्रतिनिधी
निवडणुकीपुरते राजकारण आणि त्यानंतर केवळ समाजकारण ही लोकनेते विलासराव देशमुख यांची शिकवण आहे. महापालिकेची निवडणूक आणि पदाधिका-यांची निवड प्रक्रिया आता पूर्ण झाली असून, नूतन पदाधिका-यांनी व नगरसेवकांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे नूतन सभापती सचिन बंडापल्ले यांनी दि. ९ मे) रात्री आयोजित केलेल्या स्नेहमिलन कार्यक्रमात माजी मंत्री, आमदार अमित देशमुख बोलत होते. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, माजी महापौर अॅड. दीपक सूळ, अॅड. किरण जाधव, मनपातील सभागृहनेते विजयकुमार साबदे, अॅड. समद पटेल उपस्थित होते. यावेळी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक व पदाधिका-यांशी संवाद साधताना माजी मंत्री, आमदार अमित देशमुख म्हणाले की, हा आपला आणि तो परका असा भेदभाव न करता विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनाही सोबत घेऊन जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा. कल्पक योजनांच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नूतन पदाधिका-यांनी प्रयत्नशील राहावे.
स्नेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी मंत्री, आमदार देशमुख यांनी शहरातील विविध प्रभागांतील समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी भविष्यात राबवायच्या योजनांबाबत उपस्थित नगरसेवकांशी विचारविनिमय केला. अत्यंत सुसंवादपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाबद्दल त्यांनी सचिन बंडापल्ले यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना खासदार डॉ. शिवाजी काळगे म्हणाले, आजचा हा स्नेह भेटीचा कार्यक्रम म्हणजे एक कौटुंबिक सोहळा असून आमच्या कुटुंबाचे बंडापल्ले परिवारासोबत गेली कित्येक वर्ष जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असून सचिन बंडापल्ले यांची निवड अतिशय सार्थ आहे. येणा-या काळात त्यांच्याकडून उत्तम काम होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना सचिन बंडापल्ले म्हणाले, आज या ठिकाणी मनपा निवडणुकीनंतर हा पहिलाच नव नियुक्त मनपा सदस्याचा स्नेह भेट कार्यक्रमाकरिता आपण एकत्र आलो असून स्नेह भेटच्या रूपाने आयोजित केलेला हा कौटुंबिक कार्यक्रम असून या निमित्ताने काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे मनपा सदस्य एकत्रित येऊन लातूरच्या विविध विषयावर चर्चा व्हावी, विचारविनिमय व्हावा हा उद्देश असून आमच्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिकपने पार पाडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सचिन गायकवाड, भालचंद्र सोनकांबळे, शहनाज गोलंदाज, अॅड. फारुक शेख, अहेमदखान पठाण, युनूस मोमीन, सुनील बसपुरे, अकबर कुरेशी, कैलास कांबळे, विकास कांबळे, आसिफ बागवान, अॅड. अतिश चिकटे, अॅड. बाबा पठाण, अभिषेक पतंगे, राजा माने, अकबर माडजे, महेश काळे, प्रा. प्रवीण कांबळे, नाना बंडापल्ले, शिरीष बंडापल्ले, एन. आर. पाटील यांच्यासह बंडापल्ले मित्र परिवार उपस्थित
होता.

