लातूर : प्रतिनिधी
वाढते तापमान, घटणारी हरित संपदा आणि बदलते पर्यावरणीय संतुलन याबाबत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी वसुंधरा प्रतिष्ठान, लातूर यांनी पावसाळ्यापूर्वीच व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली आहे. ‘उन्हाळ्यात गाडी लावण्यासाठी जागा शोधत होतात ना? मग आता पावसाळ्यात झाडे लावण्यासाठी जागा शोधा’ असा थेट आणि विचार करायला लावणारा संदेश असलेले आकर्षक फलक शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत.
या फलकांद्वारे ‘एक व्यक्ती-एक झाड’ ही संकल्पना प्रभावीपणे मांडण्यात आली असून वृक्षलागवड आणि संगोपन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. वड, कडुलिंब, गुलमोहर, बहावा, जांभूळ, आंबा, पारिजात व आवळा यांसारख्या पर्यावरणपूरक वृक्षांची माहिती देत त्यांचे सामाजिक, पर्यावरणीय व आरोग्यदायी महत्त्वही जनतेसमोर मांडण्यात आले आहे. वाढते प्रदूषण, भूजल पातळीतील घट, उष्णतेच्या लाटा आणि पर्यावरणीय असमतोलाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, हा संदेश प्रतिष्ठानच्या या मोहिमेतून दिला जात आहे.
विशेष म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच वृक्षलागवडीसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून येत आहे. वसुंधरा प्रतिष्ठानने उभारलेल्या या जनजागृती फलकांमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू झाली असून पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला नवी दिशा मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे. सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेणा-या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे, अशी माहिती या प्रतिष्ठानचे प्रा. योगेश शर्मा यांनी दिली.
















