जालना : प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील परतूर शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर तो थेट नगरपालिकेच्या कचरा वाहून नेणा-या घंटागाडीतून रुग्णालयात नेण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेकडे रुग्णवाहिका आणि शववाहिका उपलब्ध असतानाही मृतदेह अशा प्रकारे घेऊन जाण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परतूर शहरातील हिरालालनगर परिसरात राहणारा सुरेश डाकरे हा तरुण गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय आणि नातेवाईक प्रयत्न करत होते. अखेर त्याचा मृतदेह शहरातील पाण्याच्या टाकीजवळ संशयास्पद अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
मृतदेह रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी नगरपालिकेकडे स्वत:ची रुग्णवाहिका आणि शववाहिका उपलब्ध असतानाही मृतदेह चक्क कचरा गोळा करणा-या गाडीत टाकून रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेचे फोटो आणि व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच स्थानिक आमदारांच्या हस्ते नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले होते.
तसेच नगरपालिकेकडे आणखी एक रुग्णवाहिका उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उपलब्ध सुविधा असतानाही त्यांचा वापर का करण्यात आला नाही, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेवर सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पडेवार यांनी संताप व्यक्त करत संबंधित अधिकारी आणि कर्मचा-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे परतूर नगरपालिकेच्या प्रशासनावर आणि पोलिस यंत्रणेवर टीकेची झोड उठली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
















