पंढरपूर | विशेष प्रतिनिधी: पवित्र अधिक महिन्यानिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल दर्शन आणि चंद्रभागा स्नानासाठी देशभरातून भाविकांची अलोट गर्दी उसळत आहे. मात्र, या गर्दीच्या नियोजनात प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरताना दिसत असून, शहरातील वाहतूक आणि पार्किंगचा प्रश्न भीषण बनला आहे. अत्यंत खेदाची बाब म्हणजे, ज्या चंद्रभागा नदीपात्रात वाहने नेण्यास माननीय उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे, त्याच नदीपात्रात सध्या शेकडो वाहने उभी केली जात असून नदीला अक्षरशः पार्किंग झोनचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष?
ऐतिहासिक जुन्या दगडी पुलाच्या दोन्ही बाजूंना आणि नदीपात्रात भाविक आपली वाहने राजरोसपणे पार्क करत आहेत. नवीन भक्त पुंडलिक पुलाखालील परिसरातही मोठ्या प्रमाणावर बेशिस्त पार्किंग होत असल्याचे चित्र आहे. उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्बंध असतानाही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने, न्यायालयीन आदेशांच्या अंमलबजावणीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात; नदीचे पाणी दूषित
पवित्र चंद्रभागा नदीचे पाणी वारकरी ‘तीर्थ’ म्हणून ग्रहण करतात. मात्र, या वाहनांमधून येणारे काही नागरिक पुलाखालील नदीपात्रातच उघड्यावर लघुशंका आणि शौचास जात असल्याचे धक्कादायक वास्तव स्थानिक नागरिकांनी मांडले आहे. यामुळे नदीचे पाणी दूषित होत असून हे घाण पाणी पुढे पुंडलिक मंदिर परिसरापर्यंत वाहून जात आहे. या प्रकारामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या असून तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात आले आहे.
आरोग्याचा आणि पर्यावरणाचा प्रश्न गंभीर
नदीपात्रातील अस्वच्छतेमुळे जलप्रदूषण वाढले असून स्नानासाठी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नदीकाठावर आणि पुलाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग साचत असून यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
नगर परिषदेच्या भूमिकेवर सवाल
आषाढी आणि कार्तिकी यात्रेदरम्यान भाविकांच्या सुविधेसाठी पंढरपूर नगर परिषदेकडून तात्पुरती फॅब्रिकेटेड स्वच्छतागृहे उभारण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मग हीच स्वच्छतागृहे यात्रेनंतर आवश्यक त्या ठिकाणी कायमस्वरूपी का उपलब्ध करून दिली जात नाहीत? असा जळजळीत सवाल स्थानिक नागरिक आणि वारकरी उपस्थित करत आहेत. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी असून, तातडीने नदीपात्रातील पार्किंग बंद करून स्वच्छतेबाबत ठोस पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.
















