नांदेड, विशेष प्रतिनिधी: नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक १२ मधील हमीदिया कॉलनी परिसरात महावितरणच्या (MSEB) कथित हलगर्जीपणामुळे एका ७ वर्षीय चिमुकल्याचा वीज पुरवठ्याचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण नांदेड शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
खेळायला गेलेला चिमुकला परतलाच नाही
आदिल साजिद खान पठाण (वय ७ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. आदिलचे वडील साजिद खान पठाण हे मूळचे लोहा तालुक्यातील रहिवासी असून, कामानिमित्त ते कुटुंबासह नांदेड येथील हमीदिया कॉलनीत (मलंग बाबा बिल्डिंगच्या पाठीमागे) भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. ६ जून रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास आदिल खेळण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र, बराच वेळ झाला तरी तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधमोहीम सुरू केली. सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवरही त्याचे फोटो शेअर करून शोध घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.
अंधारातील तो वीज खांब ठरला ‘काळ’
रात्री उशिरा या परिसरातून जाणाऱ्या एका वाहनचालकाला वीज खांबाजवळ एक मुलगा बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. त्याने तातडीने स्थानिक नागरिकांना याची माहिती दिली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता, आदिलचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. परिसरात पुरेशा प्रकाशाचा अभाव आणि वीज खांबाला लागलेली तुटलेली सर्व्हिस वायर यामुळे खांबाद्वारे जमिनीत करंट उतरला होता. याच वीज खांबाचा स्पर्श झाल्याने आदिलचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
वारंवार तक्रारी करूनही महावितरण सुस्त
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करताना सांगितले की, या भागातील धोकादायक वीज तारा, वारंवार तुटणाऱ्या सर्व्हिस वायर आणि वीजपुरवठ्याच्या समस्यांबाबत देगलूर नाका येथील एमएसईबी कार्यालयाकडे अनेक वेळा निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, संबंधित विभागाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. “काही दिवसांपूर्वीच याच परिसरात एमएसईबीच्या निष्काळजीपणामुळे एका शेळीचा करंट लागून मृत्यू झाला होता. त्यावेळी तरी प्रशासनाने सावध व्हायला हवे होते. मात्र, कोणतीही दुरुस्ती किंवा सुरक्षा उपाययोजना न केल्याने अखेर एका निरागस चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला.”
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
घटनेनंतर आदिलला तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह अत्यंत शोकाकुल वातावरणात नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रसंगी परिसरातील नागरिकांसह स्थानिक नगरसेवकांनीही हजेरी लावली होती. संतप्त नागरिकांनी एमएसईबीच्या संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि पीडित गरीब कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देऊन न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी केली आहे. एका निष्पाप बालकाचा बळी गेल्यानंतर तरी महावितरण प्रशासनाला जाग येईल का? आणि दोषींवर कठोर कारवाई होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
















