अमरावती : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावरून एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्याजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वॅगन आर कारमधील एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत नागरिक चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वॅगन आर कार चंद्रपूरवरून मुंबईच्या दिशेने जात होती. समृद्धी महामार्गावरील चॅनल नंबर १०५ च्या नजीक कारने पुढील ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला असून कारमधील पाचही जणांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
मृतांमध्ये एका चिमुरडीचा समावेश
या दुर्दैवी अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि समृद्धी महामार्गाच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेह गाडीबाहेर काढून रुग्णालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.
















