मुंबई : प्रतिनिधी
यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या आगमनावर महागाईची छाया पडली असून, गणेशमूर्तींच्या किमतीत तब्बल २५ ते ३० टक्क्यांची वाढ होणार आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, इंधन दरवाढ, वाहतूक खर्च, पाणीटंचाई आणि कुशल कारागिरांच्या वाढलेल्या मजुरीमुळे गणेश मूर्ती कारागिरांनी दरवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा गणेशभक्तांना बाप्पाच्या मूर्तीसाठी अधिक खर्च करावा लागणार असून, सर्वसामान्यांच्या खिशावर याचा परिणाम होणार आहे.
यंदा १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून, सध्या राज्यभरातील मूर्ती कारखान्यांमध्ये रंगकाम आणि अंतिम सजावटीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने मूर्तिकार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मूर्ती तयार करण्यासाठी लागणा-या प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडू माती, रंग, रसायने, ताडपत्री, प्लास्टिक कागद, आदी साहित्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पीओपीच्या एका बॅगमागे सुमारे ५० रुपयांची वाढ झाली असून, पूर्वी २५० रुपयांना मिळणारे साहित्य आता ३०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे कच्चा माल कारखान्यांपर्यंत आणणे आणि तयार मूर्ती विविध शहरांमध्ये पोहोचवण्याचा खर्चही वाढला आहे. त्यातच काही ठिकाणी पाणीटंचाईमुळे पाणी जपून वापरावे लागत आहे. त्याचबरोबर कुशल कारागिरांचे मानधनही वाढल्याने मूर्ती निर्मिती अधिक खर्चिक झाली आहे.
रंग, प्लास्टर, माती, सजावटीचे साहित्य आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाल्याने गणेशमूर्तींच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी वाढवाव्या लागल्या आहेत. तरीही आम्ही दर्जेदार व पर्यावरणपूरक मूर्ती कमी दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. गणेशभक्तांकडूनही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
















