नाशिक : प्रतिनिधी
नाशिककरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. हवामान खात्याने नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात तब्बल ३५० मिलीमीटर पावसाचा, म्हणजेच ‘ढगफुटी’चा धडकी भरवणारा इशारा दिला होता. मात्र, पालघरमध्ये हाहाकार उडवणारा पावसाचा ‘भोवरा’ ऐनवेळी नाशिकच्या वेशीवरून उत्तरेकडे गुजरातच्या सुरतच्या दिशेने आणि दक्षिणेकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले परिसराकडे सरकला आहे.
पालघर जिल्ह्यात तब्बल ४५० मिमी पावसाची नोंद करणारा हवामानातील तोच ‘भोवरा’ सोमवारी रात्री त्र्यंबकेश्वर-नाशिक मार्गे सरकण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. यामुळे नाशिकमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. सोमवारी रात्रभर पावसाने शहरात जोरदार हजेरीही लावली. मात्र, मंगळवारी सकाळी हवामानाच्या स्थितीत मोठा बदल झाला. हा भोवरा नाशिककडे न येता उत्तरेकडे गुजरातच्या सुरतच्या दिशेने आणि दक्षिणेकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले परिसराकडे सरकला आहे. यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरवरील ढगफुटीचा धोका ब-याच अंशी कमी झाला आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची संततधार सुरूच असून हवामान विभागाने आज अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, जालना, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
घाटमाथ्यावर अद्यापही धोक्याचा इशारा
शहरावरील संकट टळले असले तरी, आणि मंगळवारी सकाळी नाशिक शहरात पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी घाटमाथ्यावरील परिस्थिती अद्यापही गंभीर आहे. इगतपुरी, कसारा आणि त्र्यंबकेश्वर भागात मुसळधार पाऊस सतत कोसळत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आणि विशेषत: पर्यटकांनी विनाकारण घराबाहेर किंवा धबधब्यांच्या ठिकाणी जाऊ नये, असे कडक आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
















