मुंबई : प्रतिनिधी
मुंबई, पुण्यासह कोकणातही पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. रत्नागिरीच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे पावसाचा मारा सुरू असताना रस्त्यावर दरडी कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तर कल्याणमध्ये भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. खेड, कल्याणसहित राज्यातील विविध भागात भीषण दुर्घटना घडल्या आहेत. विविध भागात घडलेल्या घटनांची माहिती समोर येत आहे.
रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील दहिवलीमध्ये दरड कोसळून २ जण मातीच्या ढिगा-याखाली अडकले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले. त्यानंतर कॅबिनेट मंत्री उदय सामंत घटनास्थळी दाखल झाले आहेत. खेड तालुक्यातील दहिवली येथे आज पहाटे दरड कोसळण्याची घटना घडली. या दुर्घटनेतून एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या घटनेची माहिती मिळताच महसूल, पोलिस, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली.
नवी मुंबईत धावत्या बेस्ट बसमध्ये चालकाला फीट
नवी मुंबईच्या वाशीमध्ये नवीन टोलनाक्यावर एक मोठी दुर्घटना घडली. बेस्ट बसच्या चालकाला अचानक धावत्या गाडीत फीट आल्याने बसवरील ताबा सुटला. त्यानंतर बस टोलनाक्यावरील लेन नंबर ६ आणि ७ या दरम्यान आदळली. या भीषण अपघातात बसचालक गंभीर जखमी झाला आहे. तर बसमधील ३ ते ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. वाशी टोलनाक्यावर हा प्रसंग घडला आहे. किरण जाधव असे बसचालकाचे नाव आहे.
कल्याणमध्ये आरोग्य केंद्राची भिंत कोसळली
कल्याण पूर्वेतील ड मुख्य प्रभाग कार्यालय परिसरात दुर्गेश इमारतीलगत असलेल्या महापालिकेच्या आरोग्य केंद्राची भिंत कोसळली आहे. या घटनेमुळे इमारतीच्या पंपरूम आणि कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. आरोग्य केंद्राच्या खालची संरक्षक भिंत कोसळल्याने इमारतीलगतचा काही भाग धोकादायक बनला आहे.
















