मुंबई : प्रतिनिधी
भारताने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन टी-२० सामन्यांतील दोन सामने गमावल्यानंतर संघाच्या कॉम्बिनेशन आणि संघ निवडीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये ९७, ८९ आणि ८९ धावांची खेळी करणा-या संजू सॅमसनला गेल्या दोन सामन्यांत प्लेईंग ११ मधून वगळून वैभव सूर्यवंशीला संधी दिली होती. मात्र संजूला संघाबाहेर काढण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
वर्ल्डकप विनर खेळाडूला अशा प्रकारे बाहेरचा रस्ता दाखवणे कितपत योग्य आहे अशी चर्चा सुरू आहे. त्याबाबत बोलताना, भारतीय संघात कोणत्याही खेळाडूची जागा ही कायमची नाही असे गौतम गंभीरने खुलेपणाने आपले म्हणणे मांडले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या तिस-या टी-२० सामन्यानंतर गंभीरने संजू सॅमसनबाबत भूमिका स्पष्ट केली. त्यांनी संजूला अचानक संघातून वगळण्यात आलेले नाही. त्याला याबाबत पूर्वकल्पना दिली होती आणि त्याच्यासोबत याबाबत सविस्तर चर्चा झाली होती.
टीम इंडियात जागा कमवावी लागते
गंभीरने निवडीबाबतच्या रणनीतीबाबत स्पष्ट संदेश दिला आहे. ते म्हणाले की भारतीय संघात कोणत्याही खेळाडूची जागा ही कायमची नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निर्णयांचा खेळ असतो. जे कॉम्बिनेशन आम्हाला विजय मिळवून देऊ शकतो, ते कॉम्बिनेशन आम्ही खेळवतो.
गंभीरचे हे सूचक वक्तव्य अशावेळी आले आहे ज्यावेळी गतवेळच्या वर्ल्डकप विजेत्या संघातील सर्व प्रमुख चेहरे सध्या प्लेईंग ११ च्या बाहेर आहेत. फक्त संजू सॅमसन नाही तर सूर्यकुमार यादव देखील सध्याच्या संघात नाही.
टीम रिसेट होतेय
गंभीरने सांगितले की, ज्यावेळी एखादी टीम रिसेट होत असते त्यावेळी थोडा वेळ लागू शकतो. या संघाचा कर्णधार बदलला आहे. सलामी जोडी बदलली आहे. हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराहसारखे खेळाडू नाहीयेत. १५ वर्षांचा मुलगा ओपनिंग करत आहे. काही खेळाडू आपले सुरुवातीचे आंतरराष्ट्रीय सामने खेळत आहेत. अशा वेळी थोडे धैर्य दाखवले पाहिजे.
गंभीर म्हणाला, संजूला जेवढे स्पष्ट सांगणे गरजेचे होते तेवढे सांगण्यात आले आहे. मी त्याला स्पष्टता दिली आहे. हे संभाषण फक्त कोच आणि खेळाडू यांच्यामधील आहे. त्यामुळे याबाबत सार्वजनिकरीत्या काही बोलले जाणार नाही.
वर्ल्डकपमध्ये तळपली होती बॅट
मार्चमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये संजू सॅमसनने नॉक आऊट स्टेजमध्ये नाबाद ९७, ८९ आणि ८९ धावांची पाठोपाठ खेळी केली होती. त्याने भारताच्या वर्ल्डकप विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्यांना प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार देखील मिळवला होता. आयपीएलमध्ये देखील त्याची बॅट तळपली होती.
गौतम गंभीर म्हणाला, संघ निवड ही जुन्या कामगिरीच्या जोरावर नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या त्या खेळाडूचा फॉर्म कसा आहे यावर होते. टीमचे कॉम्बिनेशन देखील जास्त महत्वाचे आहे. संजूने वर्ल्डकपमध्ये भारतासाठी जे काही केलं ते जबरदस्त होतं. मात्र कधी कधी खेळाडूचा सध्याचा फॉर्म देखील पहावा लागतो. याचा अर्थ तो पुनरागमनच करू शकणार नाही असा होत नाही. गंभीरने संजू सॅमसनला टीममधून बाहेर काढण्याचा निर्णय हा कायमचा नाहीये. म्हणजे संघ व्यवस्थापनाने संजूच्या पुरनागमनासाठीचे सर्व दरवाजे बंद केलेले नाहीत असे संकेत गंभीरने दिले आहेत.
















