मुंबई : प्रतिनिधी
पावसाळी अधिवेशनात पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ला पडलेले खड्डे आणि पावसातील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. यावर बोलताना काल (गुरुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उद्देशून ‘भाडे के टट्टू’, ‘देख लुंगा..’ अशा शब्दांत खिल्ली उडवली. फडणवीस यांच्या या टीकेवरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियासह विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकच्या उद्घाटन सोहळ्यानंतर पहिल्याच पावसात मिसिंग लिंकच्या तोंडावर दरड कोसळल्यामुळे विरोधी पक्षांकडून भाजप सरकारवर टीका होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करणा-यांना थेट ज्यांना कुत्रे विचारत नाही, ते सोशल मीडियावर पैसे घेऊन टीका करतात, त्यांना आता ‘देख लुंगा’ अशी भाषा वापरली. त्यांच्या या टीकेवर अंजली दमानिया यांनीदेखील पलटवार केला आहे. फडणवीसांच्या वक्तव्यावरून अहंकार, फक्त आणि फक्त अहंकार दिसत असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्यांची गरज : राऊत
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट करत मुख्यमंत्र्यांवर घणाघात केला. राऊत म्हणाले, वैफल्य, अहंकार, माज वगैरे वगैरे.. हे सर्व क्षणात उतरेल! महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्यांची गरज आहे! पण काय करणार? खाण तशी माती! देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणीबाणी लागू केली आहे काय? सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार, लूटमार, झुंडबाजीवर जनतेने बोलायचे नाही ही आणीबाणीच आहे! असे राऊत म्हणाले.
बिनकामाचे सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही : यशोमती ठाकूर
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषेचा समाचार घेताना म्हटले की, ज्यांनी आयुष्यभर भाडोत्री लोक वापरून दुस-यांवर टीका केली, त्यांना आज स्वत:वर होणारी उत्स्फूर्त टीकाही भाडोत्री वाटते. ‘लोकशाहीत टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही नुकतेच सरकारला फटकारले आहे. मोठ्या पदावर बसलेल्या नेत्यांनी जनतेच्या टीकेला खिलाडूवृत्तीने घेऊन कामात सुधारणा करायची असते. विधान भवनातून अशा धमक्या द्यायच्या नसतात.’ बॉडी लँग्वेज सांगत आहे, मिसिंग लिंकचा दणका जोरात बसलाय! हे ‘बिनकामाचं सरकार’ म्हणजे महाराष्ट्र नाही… आणि फडणवीस म्हणजे महाराष्ट्र तर अजिबातच नाही, असा टोला ठाकूर यांनी लगावला.
विरोधकांनी प्रश्न मांडणे म्हणजे मुख्यमंत्र्यांची बदनामी नव्हे : विजय वडेट्टीवार
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संविधानात्मक चौकटीची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. महाराष्ट्र हा १४ कोटी जनतेचा स्वाभिमानी प्रदेश आहे. रस्ते, भ्रष्टाचार, विकासातील उणिवा किंवा जनतेचे प्रश्न मांडणे ही विरोधी पक्षाची घटनात्मक भूमिका आहे. विरोधकांनी जनहिताचे प्रश्न मांडणे म्हणजे मुख्यमंत्र्यांची बदनामी नव्हे. मुख्यमंत्र्यांनी टीका वैयक्तिक न घेता जनतेच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.
फडणवीस आज ‘देख लुंगा’ म्हणतात : अंजली दमानिया
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही मुख्यमंत्र्यांच्या अहंकारावर बोट ठेवले. ‘फक्त आणि फक्त अहंकार… मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्र पाहत असताना, सगळ्यांना ‘भाडे के टट्टू’ म्हणणे एका मुख्यमंत्र्यांना शोभते का? प्रत्येक प्रोजेक्टमध्ये अफाट भ्रष्टाचार होत असताना आवाज उठवला तर मुख्यमंत्री म्हणतात ‘देख लुंगा’? हेच फडणवीस कोणे एके काळी भ्रष्टाचाराचे मुद्दे अधिवेशनात मांडायचे आणि आज असे बोलत आहेत, अशी खंत दमानिया यांनी व्यक्त केली.
हुकूमशाहीकडे वाटचाल : बाळासाहेब थोरात
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही पावसाळी अधिवेशनातील कामकाजावर आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.
अध्यक्षांची भूमिका : विधानसभेचे आणि विधान परिषदेचे अध्यक्ष आता सत्ताधा-यांच्या इशा-यावर काम करत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. लोकशाहीत समर्थ विरोधी पक्ष असणे महत्त्वाचे असते. आपण हुकूमशाहीकडे चाललो आहोत. जगात माध्यम स्वातंत्र्यात भारताचा क्रमांक १५६ वा आहे, ही चांगली गोष्ट नाही.
















