रायगड : प्रतिनिधी
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या दुथडी भरून वाहत असून, अनेक भाग जलमय झाले आहेत. या पावसादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा परिसरातून वाहणा-या पाताळगंगा नदीत शेकडो गॅस सिलिंडर वाहत जात असल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले. सुरुवातीला हे सिलिंडर नेमके कुठून आले याबाबत संभ्रम होता. मात्र, आता याबाबत प्रशासनाने माहिती दिली असून, पनवेल तालुक्यातील चावणे येथील एचपीसीएलच्या एलपीजी बॉटलिंग प्लांटमधून अतिवृष्टीमुळे सुमारे ३ हजार गॅस सिलिंडर पाताळगंगा नदीत वाहून गेल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये भरलेले तसेच रिकामे अशा दोन्ही प्रकारचे सिलिंडर असल्याची माहिती आहे.
मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीला मोठा पूर
दरम्यान, नदीतून वाहत जाणारे सिलिंडर दोरीला हूक लावून बाहेर काढण्याचा प्रयत्न काही नागरिक करताना दिसून आले. रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीला मोठा पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात पनवेल तालुक्यातील चावणे येथील एचपीसीएल पाताळगंगा एलपीजी बॉटलिंग प्लांटमधील अंदाजे ३ हजार गॅस सिलिंडर वाहून गेले आहेत. यामध्ये काही सिलिंडर गॅस भरलेले तर काही रिकामे असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
सिलिंडर हाताळताना धोका पत्करू नये
पुराच्या प्रवाहासोबत हे सिलिंडर खारपाडा परिसरातून खाडीच्या दिशेने मोठ्या वेगाने वाहताना दिसले. या घटनेचे व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. काही नागरिकांनी नदीतून सिलिंडर बाहेर काढण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
नदीतून किंवा परिसरात वाहून आलेले एचपीसीएलचे गॅस सिलिंडर कोणालाही सापडल्यास ते स्वत:कडे न ठेवता तात्काळ एचपीसीएल कंपनी, जवळच्या एचपीसीएल वितरक, तहसीलदार कार्यालय खालापूर, तहसीलदार कार्यालय पेण किंवा उपविभागीय अधिकारी, पेण यांच्या कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच नागरिकांनी अशा सिलिंडरची हाताळणी करताना कोणताही धोका पत्करू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
















