पंढरपूर : प्रतिनिधी
आषाढी वारीसाठी पंढरपुरात विठू माऊलीच्या दर्शनाला येणा-या लाखो वारक-यांसाठी प्रशासनाने एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंढरपूर शहर आणि आजूबाजूच्या परिसरात उद्यापासून (१५ जुलै) थेट २९ जुलै पर्यंत असे १५ दिवस मांस आणि मटण विक्रीवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिका-यांनी हे कडक आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे पंढरपुरातील खवय्यांची अडचण होणार असली, तरी लाखो वारकरी आणि भाविकांमधून या निर्णयाचे जोरदार स्वागत केले जात आहे.
आषाढी यात्रेच्या काळात दररोज लाखो वारकरी पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पायी चालत येत असतात. या पवित्र काळात शहरातील विविध भागांत सुरू असणा-या मांस आणि मटण विक्रीमुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिका-यांनी जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, पुढील १५ दिवस म्हणजेच १५ जुलै ते २९ जुलै या वारीच्या काळात पंढरपूर शहर आणि परिसरात कुठेही मांस किंवा मटणाची विक्री करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
पाच नव्या को-या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस!
एकीकडे मटण विक्रीवर बंदी असताना, दुसरीकडे पंढरपूरकडे येणा-या वारक-यांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी एसटी महामंडळाने पावले उचलली आहेत. आषाढी यात्रेपूर्वी पंढरपूर आगाराला ५ नव्या को-या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस मिळाल्या आहेत. या सर्व बसेसचे लोकार्पण पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले.
लाखो भाविकांची वाहतूक सुरक्षित
याप्रसंगी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी विश्वास व्यक्त केला की, वारीच्या काळात वारकरी भक्तांना उत्तम आणि दर्जेदार सेवा-सुविधा पुरवणे हे आमचे कर्तव्य आहे. यात्रेपूर्वी पंढरपूर आगाराला महामंडळाकडून अजून काही नवीन बसेस मिळणार आहेत. लाखो भाविकांची वाहतूक सुरक्षित आणि सुकर करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. या नवीन गाड्यांमुळे विठ्ठल भक्तांचा वारीचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
















