छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मुंबई पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात यंदा पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे त्या भागातील प्रकल्प, नदी, नाले तुडुंब झाले. परंतु मराठवाड्याला यंदा मोठी प्रतीक्षा करावी लागली. पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले. आता कुठे मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली असून, दोन दिवसांपासून या भागांत रिपरिप सुरू आहे. काही भागांत दमदार हजेरी लावल्याने मराठवाड्याला दिलासा मिळाला.
जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. किनवट भागांतही पूर आला. परंतु बहुतांश भागाला अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, विदर्भात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून, नदी, नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, अनेक भागांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यात पावसाळ््याच्या सुरुवातीपासून दमदार पाऊस झालाच नाही. मागच्या ब-याच दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतक-यांची चिंता वाढली होती. एवढेच नव्हे तर काही भाग वगळता मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट घोंगावत होते. मात्र, दोन दिवसांपासून मराठवाड्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले असून, ज्या भागांत पेरणी रखडली होती, त्यांच्या पेरणीचा मार्ग मोकळा झाला होणार आहे. दरम्यान, पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यात जालन्यासह बदनापूर, अंबड, मंठा आणि घनसावंगी तालुक्यांसह जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला. यामुळे, खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. यासोबतच छ. संभाजीनगरस बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर जिल्ह्यातही मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे या भागालाही दिलासा मिळाला आहे. यामुळे पिके तरारली आहेत. लातूर जिल्ह्यातही दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, गुरुवारी दिवसभर जिल्ह्यात सर्वत्र रिपरिप सुरू होती. धाराशिव जिल्ह्यातही अशीच स्थिती राहिली. त्यामुळे पिकांना मोठा आधार झाला आहे. परंतु या भागात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
विदर्भात जोर वाढला
विदर्भातही अमरावती, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. भंडारा जिल्ह्यात दुपारी अचानक सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली. तुमसरमध्ये तासभर मुसळधार पावसाची धुमशान सुरू होती. त्यामुळे सखल भागांत पाणी साचले. सलग पाचव्या दिवशी भंडारा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू असून, सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे ४ गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. आल्लापल्लीत अनेक घरांमध्ये पाणी शिरले. पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली गेले आहेत. यासोबतच नागपूरसह अकोला, बुलडाणा, अकोला, वाशिम भागातही पावसाने हजेरी लावली.
मेळघाटात हाहाकार
अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील धारणी तालुक्यात बुधवारी दिवसभर आणि रात्री मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे नद्या आणि ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ झाली. येथील सिपना नदीला पूर आला असून, पाणी पुलावरून वाहत आहे. त्यामुळे २० ते २५ गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला.
















