जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यात सलग तिस-या दिवशीही जोरदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक लहान नद्या, नाले व ओढ्यांमध्ये पाण्याची आवक वाढली असून सखल भागातील नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस आणखी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
घोंणशी मंडळात मागील दोन दिवसांत ९० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या परिसरातील नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून आणखी पाऊस झाल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरुवारी जळकोट मंडळातही दिवसभर मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक लहान कालवे व नद्यांना पाणी आले आहे. सततच्या पावसामुळे शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी नदीकाठच्या गावांमध्ये खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषत: नदीपात्रालगतच्या भागात राहणा-या नागरिकांनी अनावश्यक हालचाल टाळावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तहसीलदार राजेश लांडगे यांनी बेळसांगवी, चिंचोली, तिरुका, मरसांगवी आणि गव्हाण येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीला पूर आल्यास नदीपात्राजवळ जाणे टाळावे, नदीत उतरण्याचा प्रयत्न करू नये तसेच पुलावरून पाणी वाहत असल्यास कोणत्याही परिस्थितीत पूल ओलांडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
प्रशासनाकडून महसूल, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेस सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
















