मुंबई : प्रतिनिधी
नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात २५ हजार कोटींची उधळपट्टी होत आहे. विकासकामांच्या निमित्ताने मोठा भ्रष्टाचार होत आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (२९ ऑगस्ट) केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी (२८ऑगस्ट) नाशिकमध्ये होते. त्यावेळी त्यांच्या सभेला उपस्थिती पाहिली तर नाशिककरांनी मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यावर, भाषणावर बहिष्कार टाकल्याचे दिसून येईल, असाही दावा संजय राऊत यांनी केला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे आता लोकांनी गांभीर्याने पाहणे सोडले. कुंभमेळ्याचे योग्य नियोजन नसल्याने नाशिकमध्ये कशीही कामे सुरू आहेत आणि नाशिकरांचे हाल होत आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.
कुंभमेळ्याच्या भ्रष्टाचारावर केवळ विरोधकच टीका करत नाही तर साधूही टीका करत आहेत, असे संजय राऊत यांनी सरकारला सुनावले. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे ४५ हजार कोटी रुपये बजेट आहे त्यातील किमान २५ हजार कोटी रुपये कुंभमेळा मंत्री आणि त्यांचे अधिकारी उडवणार आहेत. याची सुरुवात झाली आहे, असा गंभीर आरोप यावेळी खासदार संजय राऊत यांनी केला. सरकारला नाशिकमधील खड्डे दिसत नाहीत का? या खड्ड्यांनी घेतलेले बळी दिसत नाहीत का? असे सवाल राऊत यांनी केले. या सरकारची अवस्था महात्मा गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे झाली आहे. गांधीजींची माकडे नितीमत्तेची होती. यांची वेगळी आहे. या माकडांना भ्रष्टाचार दिसत नाही, ते भ्रष्टाचारावर बोलणार नाही आणि भ्रष्टाचार पाहात नाहीत. त्यामुळे सरकार काय करत आहे, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
जे मुख्यमंत्री राम मंदिरातील दानचोरीवर बोलत नाहीत त्यांना कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही, असा घणाघाती आरोप यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. ज्यांनी अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटी लुटली त्यांचेच तुम्ही वारसदार आहात, असा टिकेचा आसडून राऊत यांनी ओढला.
मुख्यमंत्र्यांना खोटे बोलण्यासाठी डिग्री द्यावी लागेल
नाशिकमधील कामांमध्ये कसलेही नियोजन नाही, फक्त टेंडर काढून कंत्राटदारांना कामे देणे एवढेच यांचे काम आहे. १० वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी नाशिक शहराला दत्तक घेतले होते हे ते विसरले. तेव्हापासून नाशिक शहराची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे यांना मुख्यमंत्री फडणवीसांना खोटे बोलण्यासाठी डिग्री द्यावी लागेल जशी दिल्ली विद्यापीठाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘मास्टर डिग्री इन एन्टायर पॉलिटिक्स’ दिली होती, असे टीकास्त्र संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.
















