परभणी : संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने ताण दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या अवस्थेत आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतक-यांना वा-यावर न सोडता महायुती सरकार खंबीरपणे शेतक-यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीतील शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात बोलताना दिली.
परभणी शहरातील इंदिरा गांधी स्टेडीयम मैदानावर रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी शेतकरी व युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे मेळाव्यास उपस्थित शेतकरी व युवकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल, खा. संजय जाधव, आ. हिकमतदादा उडान, आ. सईद खान, माजी खा. ऍड. सुरेश जाधव, माजी आ. शंकरअण्णा धोंडगे, माजी आ. हरीभाऊ लहाने, परभणीचे माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख, जिल्हाप्रमुख विशाल कदम, आनंद भरोसे, गंगाप्रसाद आनेराव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आजच्या शेतकरी व युवा संवाद मेळाव्याला असलेली गर्दी जमवलेली किंवा भाड्याची नसून मनापासून उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणी, भाऊ व शेतक-यांची गर्दी आहे. महायुती सरकारने प्रत्येकाच्या नावापुढे आईचे नाव लिहीण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. केंद्राप्रमाणे राज्याने शेतक-यांना ६ हजार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्जमाफी योजनेचा १२ शेतक-यांना लाभ मिळाला आहे. शेतकरी व युवकांच्या हिताच्या योजना प्राधान्याने सुरू राहतील. महायुती सरकार सदैव शेतक-यांच्या हिताचा निर्णय घेणारे असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
खा. संजय जाधव यांच्या मागणीनुसार परभणीत नवीन एमआयडीसी सुरू करण्यासाठी तात्काळ प्रयत्न करण्यात येतील. केवळ महानगरांचा नव्हे तर चांदा ते बांदा पर्यंतचा विकास करण्यासाठी सरकार कटीबध्द आहे. शेतक-यांना केवळ कर्जमाफी देऊन सरकार थांबणार नाही, तर त्यांना जोड उद्योग करण्यासाठी संधी देणार आहे. त्यासाठी परभणीत १.५ हजार कोटींची लवकरच गुंतवणूक करण्यात येईल. राजकारण करताना विकासाचा अजेंडा पाहिजे. विरोधात राहून विकास साधता येत नाही. त्यामुळे खा. संजय जाधव यांनी परभणीकरांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी ख-या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विकासाच्या या लढ्यात खा. जाधव यांच्या पाठीशी राहून परभणीकरांना रस्ते, गटार आणि स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करील असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. यावेळी कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल, खा. संजय जाधव यांनी मेळाव्यास उपस्थित शेतकरी व युवकांना मार्गदर्शन केले. या मेळाव्याला लाडक्या बहिणी, युवक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माझा आवाज कुणी बंद करू शकत नाही
शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण समारोपाकडे वाटचाल करत असताना अचानक माईकचा आवाज बंद झाला. त्यानंतर थोड्यावेळाने प्रयत्न केल्यानंतर माईक सुरू झाला. परंतू पुन्हा काही वेळातच माईक बंद झाला. त्यानंतर पुन्हा माईक सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माझा आवाज कुणी बंद करू शकत नाही असा मिष्कील टोमना लगावला.
कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधात नाही
परभणीतील शेतकरी व युवा संवाद मेळावा रद्द करण्यात यावा असे आवाहन मराठा समाज आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांनी समाज माध्यमातून केले होते. परंतू या मेळाव्याची तारीख २ महिन्यांपूर्वी निश्चित करण्यात आली होती. विशेष म्हणजे हा मेळावा शेतकरी व युवकांच्या विकासासाठी आयोजित केला होता. मेळावा रद्द झाला असता तर दुरवरून आलेल्या शेतकरी व युवकांना त्रास झाला असता. आपण कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधात नसल्याचे सांगत विकासाच्या लढ्यात सर्वांच्या सोबत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.
















