रियल जीडीपी ८१.३६ लाख कोटींवर, आरबीआयच्या अंदाज दरापेक्षा वाढ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर झाला. एप्रिल-जून २०२६ मध्ये देशाच्या रियल जीडीपीमध्ये ७.८ टक्क्यांनी वाढ झाली. यामुळे देशांची रियल जीडीपी सुमारे ८१.३६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर भारताची अर्थव्यवस्था आरबीआयच्या अंदाजित दरापेक्षा अधिक मजबूत राहिली. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल-जूनमध्ये जीडीपी ७.८ टक्के राहिला. आरबीआयचा अंदाज ७ टक्के होता. एक वर्षापूर्वी याच तिमाहीत तो आकडा ६.९ टक्के दराने वाढला होता.
केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने सोमवारी हे आकडे जाहीर केले. २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी ७.८ टक्के दराने वाढून ८१.३६ लाख कोटींवर पोहोचला. एक वर्षापूर्वी तो ७५.४६ लाख कोटी होता तर वास्तविक जीव्हीए ८.२ टक्क्याने वाढून ७३.८२ लाख कोटी राहिला. नाममात्र जीडीपी १०.३% ने वाढून ८८.२७ लाख कोटी नोंदवला गेला. गेल्या वर्षी तो ८० लाख कोटी होता. नाममात्र जीव्हीए ११.५% च्या वाढीसह ८०.५३ लाख कोटींपर्यंत पोहोचला.सामान्यत: ऊर्जेच्या वाढलेल्या किमती आणि महागाईमुळे आर्थिक व्यवहार मंदावतात. परंतु भारतीय अर्थव्यवस्थेने या दबावाखालीही ७.८ टक्के वाढ नोंदवली.
निकालाआधी देशातील तमाम अर्थतज्ज्ञांनी जीडीपी वाढीबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवले होते. मनीकंट्रोलच्या पोलमध्ये ७.३ टक्के वाढीचा अंदाज होता तर भारतीय रिझर्व्ह बँकेने ७ टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला. रिवटर्सच्या सर्वेक्षणात हा आकडा ७.१ टक्के होता. एकंदरीत पहिल्या तिमाहीसाठी अर्थतज्ज्ञांचा अंदाज फार फार ७.५ टक्क्यांपेक्षा कमीच होता. परंतु याच काळात भारतीय अर्थव्यवस्थेने अर्थ तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा उत्तम कामगिरी केल्याचे दिसून येत आहे.
याचे श्रेय देशातील
कष्टकरी जनतेला
केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमन यांनी जीडीपी ग्रोथविषयी माहिती देताना देशाच्या अर्थव्यवस्थेने मजबूत कामगिरी करण्याचे प्रमुख श्रेय देशातील जनतेच्या कष्टाला जाते. तसेच एनडीए सरकारने केलेल्या सुधारणा आणि चपळ व्यवस्थापनेचे उत्तम परिणाम हे निकाल आहे. पुढील काळात देशातील नागरिकांसाठी असणा-या आर्थिक संधीत वाढ करण्यात सरकार नेहमी प्रयत्नशील असेल.
देशांतर्गत मागणी,
गुंतवणुकीचा परिणाम
मुळात, देशांतर्गत मागणी, गुंतवणुका तसेच सरकारी खर्च या गोष्टींनी या कठीण काळात अर्थव्यवस्थेला मोठा आधार दिला. देशात वाढते उत्पादन आणि फायनान्स सेवा देणा-या कंपन्यांच्या कामगिरीत सुधार अशा अनेक गोष्टींचा परिणाम म्हणजे हा निकाल आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले.
मागच्या तिमाहीच्या
तुलनेत मोठी घटच
गेल्या अर्थ वर्षातील शेवटच्या तिमाहीचा निकाल (जानेवारी-मार्च २०२६) पाहिला तर जीडीपी ग्रोथ ८.६ टक्के नोंदवण्यात आली होती. ही वाढ एप्रिल-जून २०२६ तिमाहीच्या तुलनेने नक्कीच अधिक आहे. परंतु गेल्या अर्थ वर्षातील पहिल्या तिमाहीच्या निकालापेक्षा यंदाच्या अर्थ वर्षातील पहिल्या तिमाहीचा निकाल चांगला मानला जात आहे. गेल्या अर्थ वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढ ६.९ टक्के होती.
















