रेणापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, लाभार्थी व सर्वसामान्य नागरिकांचे विविध प्रश्न गेल्या काही काळापासून प्रलंबित असून, त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून त्याची लेखी माहिती द्यावी, अन्यथा १५ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालयासमोर ‘जागरण गोंधळ’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे पिकांचे तातडीने पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा आणि दुष्काळी निकषानुसार सवलती लागू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीनुसार कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. तालुक्यातील पात्र शेतक-यांना पीकविमा रकमेचे तातडीने वाटप करावे, शेतक-यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी आणि शेतमजूर कुटुंबांना २५ हजार रुपयांची विशेष मदत जाहीर करावी, रेशीम शेतीचे प्रलंबित अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करून नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू करावी. नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना देण्यात येणारे प्रोत्साहनपर अनुदान ५० हजारांवरून एक लाख रुपये करावे, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निराधार लाभार्थ्यांच्या अनुदानाचा प्रश्न संजय गांधी निराधार योजनेतील मंजूर लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान तातडीने अदा करावे. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावेत, रेशन व्यवस्थेतील अपात्र व्यक्तींची चौकशी करून त्यांची नावे कमी करावीत आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा संचालक प्रमोद कापसे, शहराध्यक्ष नितीन मोटेगावकर, केशव माने, बिविशन कदम, सचिन मोटेगावकर, प्रकाश सूर्यवंशी, अमरेश भिसे, संतोष शिंदे, गोविंद वीर, कल्याण शाहीर, नरेंद्र शिंदे, बाळासाहेब फुंदे, गोविंद पवार, बाळासाहेब करमुडे, बालासाहेब अहिललवाड, सुरज वंगाटे, बालाजी हाके, हरिभाऊ जाधव, सुभाष रामा राठोड, उरगुंडे दिलीप, सोनेराव ठेंगडे, भीमाशंकर कोरे, आशादुल्ला सय्यद, उमेश शिंदे, प्रदीप चव्हाण, अॅड. मुरलीधर पडोळे, पृथ्वीराज देशमुख, दत्ता बारसकर, ज्ञानोबा कोल्हे, विलास राठोड, मदने रघुनाथ, भंडारे हनुमंत, अजयकुमार चक्रे, सुग्रीव जाधव, संदीपान देशमुख, पंडित माने, शेख पाशामिया, बाळासाहेब गरड, सचिन पुंडलिकराव इगे, तानाजी देशमुख, दत्ता डिगोळे, रामदादा शिंदे, अनंत शिंदे, बालाजी अकनगिरे, राज मस्के, आनंत पाटील आदी उपस्थित होते.
















