परभणी : राज्यात मुलींना मोफत शिक्षणाची घोषणा सरकारने केली होती. परंतू त्याची अंमलबजावणी अद्याप केली नाही. शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे मुली आत्महत्या करत आहेत. त्यामुळे सरकारला जाग कधी येणार असा सवाल करत मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या मागणीची विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याची माहिती आ. डॉ. राहुल पाटील यांनी दिली.
राज्यात मुलींना शिक्षण मोफत देण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. सरकारने याबाबत घोषणा केली आहे. परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. दोन दिवसापूर्वी पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील योगिता खंदारे या बारावीत शिक्षण घेणा-या मुलीने आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे आत्महत्या केली.
या आदी देखील जिंतूर तालुक्यात पुढील शिक्षणासाठी आई-वडिलांना खर्च झेपावत नसल्याने मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. बेटी बचाव बेटी पढाव असा नारा दिला जातो. परंतु त्याच मुलींसाठी शिक्षणात कुठलीही तरतूद केली जात नाही. मुली शिकाव्यात यासाठी शासनाने त्यांना १ली पासून ते उच्च शिक्षणापर्यंत मोफत सुविधा द्यायला पाहिजेत. सरकार अन्य योजनांवर अब्जावधी रुपये खर्च करते. परंतु मुलींच्या शिक्षणासाठी का नाही? असा सवाल आ. डॉ.पाटील यांनी केला आहे. मुलींनी आत्महत्या करु नये असे आवाहन त्यांनी केले आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये याबाबत आपण आवाज उठवणार अशी माहिती आ. पाटील यांनी दिली आहे.