मुंबई : देशभरात इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. याबाबत अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत, त्याचबरोबर विरोधकांनी इंधनाच्या दरात सातत्याने होणा-या वाढीबाबत सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवर आकारत असलेला व्हॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. जयंत पाटलांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवर आकारत असलेला व्हॅट आणि सरचार्ज रद्द करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
जयंत पाटलांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवर आकारत असलेला व्हॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात. यामुळे केवळ वाहनधारकांनाच नव्हे, तर वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल. कठीण आर्थिक परिस्थितीत नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महोदयांना केली. सलग दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून नागरिकांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
पत्रामध्ये काय म्हणाले जयंत पाटील?
आखाती देशातील युद्धामुळे महाराष्ट्रासह देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रचंड ताण येत आहे. महागाई प्रचंड वाढली आहे, खाद्यतेल, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा फटका थेट सामान्य माणसाला बसत आहे. त्यात भरीस भर पेट्रोल-डिझेलचे वाढणारे दर घालत आहेत. केंद्र सरकारकडून वारंवार पेट्रोल व डिझेलचे दर वाढवले जात आहेत. आज पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. पेट्रोल २ रुपये ६१ पैशांनी तर डिझेल २ रुपये ७१ पैशांनी वाढले आहे. मागील १० दिवसांत सलग चौथ्यांदा ही वाढ केली जात आहे. आज घडीला मुंबईत १११.१२ रु. प्रति लिटर पेट्रोल मिळत आहे तर डिझेल ९६.८६ रु. प्रति लिटर मिळत आहे. त्यामुळे या महागाईमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या संकटसमयी आपण पुढाकार घेऊन नागरिकांना दिलासा दिला पाहिजे.
















