मुंबई : देशभरात नीट परीक्षा पेपरफुटीमुळे आधीच गोंधळ सुरू असताना, आता महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटीचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे. या नव्या प्रकरणामुळे शासकीय व्यवस्थेला मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले असून महायुती सरकारवर नामुष्कीची वेळ आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राज्यातील १ हजार २८ केंद्रांवर रविवारी होणारी ही परीक्षा ऐनवेळी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. सातत्याने होणाऱ्या या पेपरफुटीच्या प्रकारांमुळे राज्यभरातील परीक्षार्थी उमेदवारांमधून आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हे संपूर्ण प्रकरण भिवंडीतून समोर आले असून या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे, तर मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.
रविवारी पहाटे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, भिवंडी येथे काही व्यक्तींना टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार भिवंडी पोलिसांनी तातडीने संबंधित ठिकाणी धाड टाकून तपासणी केली. यावेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी बोलावून पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान संबंधित संशयित व्यक्तींकडे आढळलेले काही प्रश्न आणि प्रत्यक्ष शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचे निदर्शनास आले. या गंभीर प्रकारानंतर भिवंडी पोलिस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ट्रॅप लावून पेपर विकणाऱ्या तीन आरोपींना पकडले असून त्यांच्या अंगझडतीतून टीईटी पेपरच्या चार वेगवेगळ्या कॉपी जप्त केल्या आहेत.
पकडण्यात आलेले तिन्ही आरोपी महाराष्ट्राबाहेरील असून ते दिल्लीहून आले होते. यामध्ये राजीव श्रीप्रयाग शाव, बिहारचा आकाशकुमार स्वराज कुमार आणि हरियाणाचा धीरज बलराज सिंग यांचा समावेश आहे. हा पेपर या आरोपींना कुठून मिळाला आणि त्यांनी तो इतर ठिकाणी कुठे विकला आहे, याचा तपास आता पोलिसांमार्फत केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच नीटचा पेपर फुटल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील मुख्य आरोपी समोर आले होते. त्यानंतर आता पहिली ते आठवीच्या शिक्षक पदांसाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करणाऱ्या या राज्यस्तरीय टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे.
या पेपरफुटीचा मोठा फटका राज्यातील ६ लाख १२५ परीक्षार्थी शिक्षकांना बसला आहे. यामध्ये पेपर १ साठी २ लाख ५८ हजार ६१ तर पेपर २ साठी ३ लाख ४२ हजार ६४ उमेदवारांनी नोंदणी केली होती. या सर्व उमेदवारांनी परीक्षेची मोठी तयारी केली होती, परंतु ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. मात्र, प्रशासनाने स्पष्ट केले आहे की या परीक्षार्थींना आता नव्याने नोंदणी करण्याची गरज नाही आणि त्यांच्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. येत्या २ ते ३ दिवसांत टीईटी परीक्षेची नवीन तारीख घोषित केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
टीईटी परीक्षा पेपरफुटीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशाने डीसीपी पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली २० जणांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले असून यात २ एसीपी आणि ९ पीआय, एपीआय यांचा समावेश आहे. दुसरीकडे, या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला असून ठाण्याचे सहपोलिस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठित करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. मुख्य आरोपी पकडल्यानंतरच हा पेपर कुठे-कुठे विक्री केला आहे आणि यात आणखी कोणाचा समावेश आहे, या सर्व प्रकरणाचा खरा खुलासा होईल.
















