नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) रोजगाराचे स्वरूप बदलत आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रातील नोक-या आणि एमबीए पदव्यांना प्राधान्य देणारा काळ आता संपत चालला आहे. त्यामुळे तरुणांनी आता केवळ पदव्यांच्या मागे न धावता प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, सुतारकाम यांसारख्या प्रत्यक्ष मानवी कौशल्यांवर आणि ‘एआय’ ज्यांना पर्याय ठरू शकत नाही अशा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावे, असा महत्त्वपूर्ण सल्ला देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी एका मुलाखतीदरम्यान दिला.
‘एआय’शी संबंधित कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारमूल्य सध्या प्रचंड फुगले असून तो एक ‘बुडबुडा’ आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या ‘एआय’ची प्रचंड भीती आणि अवाजवी कौतुक पसरवत आहेत. हा बुडबुडा फुटल्यानंतरच एआयचा नोक-यांवर होणारा खरा परिणाम समोर येईल, असे त्यांनी सांगितले. जर्मनी, स्वित्झर्लंड, जपान किंवा चीनसारख्या देशांमध्ये शारीरिक कष्टाच्या आणि तांत्रिक कौशल्यांच्या कामांना अत्यंत आदराची वागणूक दिली जाते. आपल्याकडे मात्र कष्टाच्या कामाला दुय्यम नजरेने पाहिले जाते. ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे नागेश्वरन म्हणाले.
















