अमृतसर : एअर इंडियाचे एक विमान सोमवारी रात्री मार्ग भरकटून पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात घुसले. पाकिस्तानच्या हवाई वाहतूक प्राधिकरणाने त्याला इशारा देऊन परत पाठवले. विमानाने दिल्लीतून उड्डाण केले होते आणि ते अमृतसरला उतरणार होते.
पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून विमान परत आले तोपर्यंत अमृतसर विमानतळावर वाहतूक वाढली होती, त्यामुळे ते परत दिल्लीला पाठवण्यात आले. विमानतळ अधिका-यांनी सांगितले आहे की, तांत्रिक बिघाडामुळे हे विमान मार्ग भरकटले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यापूर्वी १२ जून रोजी पाकिस्तानचे प्रवासी विमान फ्लाय जिन्ना-९पी५१४ खराब हवामानामुळे भारतीय हवाई क्षेत्रात घुसले होते. लाहोर विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमान मार्ग भरकटले होते. तथापि, तांत्रिक बिघाडाची शक्यता लक्षात येताच विमान परत पाकिस्तानी हवाई क्षेत्रात आणण्यात आले. पाकिस्तानचे विमान लाहोर विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच मार्ग भरकटले होते.
विमान ३ मिनिटे उशिराने उडाले होते
विमानतळ प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एअरबस एआय-३२१ विमानाने सोमवारी रात्री ९ वाजून १८ मिनिटांनी दिल्लीहून उड्डाण केले होते. हे विमान निर्धारित वेळेपेक्षा ३ मिनिटे उशिराने उडाले होते. उड्डाणादरम्यान विमानात तांत्रिक बिघाड झाला. विमानाला रात्री १० वाजून ३० मिनिटांनी अमृतसरमध्ये उतरणे अपेक्षित होते, परंतु ते मार्गावरून भरकटले आणि पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसले. ही गोष्ट वैमानिकालाही तेव्हाच कळली, जेव्हा पाकिस्तान एअर ट्रॅफिक अथॉरिटीकडून विमानाला इशारा मिळू लागला.
अमृतसरला धावपट्टी व्यस्त झाली होती
या घटनेनंतर लगेचच वैमानिकाने विमानाचा मार्ग बदलला आणि यू-टर्न घेऊन ते पुन्हा भारताच्या हवाई हद्दीत आले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वेळ निघून गेल्यानंतर विमान अमृतसरच्या हद्दीत पोहोचले, पण वाहतूक वाढल्याने विमानाला उतरण्याची परवानगी मिळाली नाही. विमानतळ नियंत्रण कक्षाकडून विमानाला दिल्लीला परत जाण्याचे निर्देश मिळाले. त्यानंतर विमान दिल्लीला परत गेले, जिथे त्याची सुरक्षित लँडिंग करण्यात आली. सुमारे २ तासांनंतर पुन्हा परवानगी मिळाल्यावर विमानाने अमृतसरसाठी पुन्हा उड्डाण केले आणि सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री सुमारे ४ तासांच्या विलंबाने २ वाजून २० मिनिटांनी अमृतसर विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.
















