राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठही आरोपींच्या घरावर रविवारी अयोध्या पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकले. स्थानिक दंडाधिका-यांच्या उपस्थितीत पोलिस पथकांनी लव कुश मिश्रा, अविनाश शुक्ला, रामशंकर यादव यांच्यासह सर्व आरोपींच्या घरांची झाडाझडती घेतली. हे आठही आरोपी दोन दिवसांपासून अटकेत असून त्यांना २९ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस त्यांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. रविवारी केलेल्या कारवाईत पोलिसांनी मनिष यादव याच्या घराचे कुलूप उघडून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेशी संबंधित कागदपत्रे हस्तगत केली. रामशंकर ऊर्फ टिन्नू यादव याच्यासह इतर आरोपींच्या घरावरही छापे टाकण्यात आले. या वेळी त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली आणि मालमत्ता, पार्श्वभूमी व हालचालींची माहिती गोळा करण्यासाठी शेजारी व नातेवाईकांशीही पोलिसांनी संवाद साधला. अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लव कुश मिश्रा, मनिष यादव, करुणेश पांडे, राम शंकर मिश्रा, सुभाष श्रीवास्तव आणि रामशंकर ऊर्फ टिन्नू यादव अशी या आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण राम मंदिरात जमा होणा-या रोख रकमेची आणि मौल्यवान वस्तूंची मोजणी करण्याच्या कामात होते.
राम मंदिर निधी गैरव्यवहाराच्या तक्रारी समोर आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने तीन सदस्यीय विशेष तपास पथक नेमले होते. या पथकाने सादर केलेल्या प्राथमिक अहवालानंतर संबंधित एफआयआर नोंदवण्यात आला. या मुद्यावरून आता राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस व समाजवादी पक्षाने भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. तपासात आतापर्यंत सुमारे ८० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत चोरी, विश्वासाचा गुन्हेगारी स्वरूपाचा भंग, चोरीचा माल स्वीकारणे आणि गुन्हेगारी कट रचणे तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपने राम मंदिराचे दुकान केले असून हिंदुत्वाच्या विचारसणीशी गद्दारी केली आहे, असा घणाघाती आरोप शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते म्हणाले, राम मंदिर हे हिंदूंच्या श्रद्धेचे आणि प्रेरणेचे स्थान आहे. हे मंदिर अनेक वर्षाच्या संघर्षानंतर उभे राहिले आहे. एकेकाळी ‘मंदिर वही बनायेंगे’ अशी घोषणा देणा-या भाजपचा खरा उद्देश आता समोर आला आहे.
त्यांनी हिंदुत्वाचा विश्वासघात केला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी १२.५ कोटी भक्तांकडून घेतलेल्या देणग्यांचा हिशेब कुठे आहे? असा सवाल काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी केला आहे. देणगीत कथित आर्थिक अनिश्चिततेच्या संदर्भात ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे सरचिटणीस चंपत राय यांना अटक करण्याची मागणीही त्यांनी केली. सिंह यांनी आरोप केला की, या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेची आहे; परंतु ते आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. जे लोक धर्म, सनातन धर्म आणि प्रभू रामावर विश्वास ठेवतात तेही चोरी आणि लूट खपवून घेणार नाहीत. मंदिरातील देणगी घोटाळा उघडपणे झाला आहे. महिपाल सिंह, दीनानाथ वर्मासारखे साक्षीदार उपलब्ध आहेत त्यांचे पुरावे का घेत नाही? त्यांचे जवाब का नोंदवत नाही? असा सवाल त्यांनी केला. भाजप, विहिंप आणि संघाने एकत्रितपणे सनातन धर्माच्या परंपरा नष्ट केल्या असून अनुयायांचा विश्वासघात केला आहे. विहिंप आणि संघाचा धर्म किंवा धार्मिक व्यवस्थेशी काहीही संबंध नाही. अयोध्येतील राम मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धा,
भावना आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहे. प्रभू श्रीराम भारतीय जनमाणसात सत्य, न्याय, त्याग, कर्तव्यनिष्ठा आणि मर्यादा यांचे आदर्श मानले जातात. यामुळे राम मंदिराशी संबंधित प्रत्येक निर्णय, प्रत्येक व्यवहार आणि प्रत्येक रुपयाचा हिशेब हा केवळ प्रशासकीय किंवा आर्थिक बाब नसून जनतेच्या विश्वासाशी निगडीत विषय ठरतो. अशा परिस्थितीत मंदिरासाठी भक्तांनी अर्पण केलेल्या देणग्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांनी, चांदीच्या विटा गायब झाल्याच्या दाव्यांनी, हिरे-दागिन्यांच्या नोंदीतील विसंगतींनी आणि निधीच्या वापरातील पारदर्शकतेवर उपस्थित झालेल्या प्रश्नांनी गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. कारण येथे केवळ पैशांचा हिशेब नाही तर लाखो-कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धेचा आणि सार्वजनिक विश्वासाचा प्रश्न आहे. रामाच्या नावाने भावनिक लाट निर्माण करून राम मंदिर आंदोलन उभे करणे हा देशाच्या राजकारणातील सर्वांत मोठा राजकीय प्रयोग मानला जातो. रामाच्या नावावर मते मागून निवडणुका जिंकल्या, राज्यात सरकारे आणली की दिल्लीची सत्ता मिळवण्यातही यश आले त्यामुळे राम मंदिराचा मुद्दा हा श्रद्धेइतकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त राजकारणाशीही जोडला गेला होता. रामाच्या नावावर उभी राहिलेली राजकीय व्यवस्था सुशासन आणण्यासाठी नाही तर रामाच्या नावाखाली लोकांची लूट करून आपली तुंबडी भरण्यासाठी केलेली होती का?
राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आणि भाजपच्या काही नेत्यांनी जिथे मंदिर होणार होते तिथे काही जमिनी घेतल्या. २ कोटी रुपयांना घेतलेली जमीन ट्रस्टला १८ कोटी रुपयांना विकून १६ कोटी रुपयांचा नफा कमावल्याची अनेक प्रकरणे आहेत. देशातील कोट्यवधी लोकांनी राम मंदिर उभारणीसाठी आपल्या कष्टाच्या कमाईतून ३ हजार ५०० कोटींहून अधिकची रक्कम देणगी म्हणून दिलेली आहे. त्या सोबतच सोने, चांदी, हिरे आणि दागिने किती मिळाले? याचा हिशेब ट्रस्टने कधी दिला नाही. मंदिराच्या बांधकामातील दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित झाले. राम मंदिरासाठी अनेक वर्षापासून संघ आणि भाजपशी संबंधित अनेक संस्था आणि लोक रोख रक्कम, सोने आणि चांदीच्या विटा गोळा करत होते त्याचे पुढे काय झाले? त्या कुठे गेल्या? याचा हिशेब कधीच समोर आला नाही. ज्या राजकीय व्यवस्थेने भ्रष्टाचार विरोधात झिरो टॉलरन्सची भाषा केली होती. ना खाऊंगा, ना खाने दुंगा, अशी घोषणा केली होती तीच व्यवस्था या प्रकरणात पूर्ण पारदर्शक चौकशीबाबत मौन का बाळगते आहे? असा प्रश्न उपस्थित होतो.
















