मुंबई : प्रतिनिधी
भारताचा दिग्गज खेळाडू अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर व्हीडीओ पोस्ट करत अजिंक्य रहाणे याने निवृत्तीची घोषणा केली.
अजिंक्य रहाणेने ८५ कसोटी सामन्यांत ५ हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या १८८ इतकी राहिली आहे. त्याच्या नावावर १२ शतके आणि २६ अर्धशतके आहेत. वनडेमध्ये त्याने ८७ डावांत २९६२ धावा केल्या आहेत. त्याने ३ शतके, २४ अर्धशतके ठोकली आहेत. अजिंक्य रहाणे याने २० टी-२० मध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. २० डावांत त्याला फक्त ३७५ धावाच करता आल्या, त्याच्या नावावर फक्त एका अर्धशतकाची नोंद आहे.
अजिंक्य रहाणेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक भावनिक व्हीडीओ शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली. या व्हीडीओसोबत रहाणेने लिहिले, कॅप २७८ आता निरोप घेत आहे. इतकी वर्षे दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद. तुमचा मी कायम ऋणी राहीन.
गेल्या काही वर्षांपासून रहाणे टीम इंडियाच्या बाहेर होता. त्याने भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०२३ मध्ये खेळला होता. जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये तो शेवटचा भारतीय जर्सीत मैदानात उतरला होता. त्याआधी त्याने अखेरचा वनडे सामना २०१८ मध्ये तर शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २०१६ मध्ये खेळला होता.
अजिंक्य रहाणेच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीवर नजर टाकली तर त्याने भारतासाठी ८५ टेस्ट, ९० वनडे आणि २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने १४४ डावांमध्ये ३८.४६ च्या सरासरीने आणि ४९.५० च्या स्ट्राईक रेटने ५,०७७ धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून १२ शतके आणि २६ अर्धशतके झळकली. कसोटीतील त्याची सर्वोच्च खेळी १८८ धावांची होती.
















