नांदेड : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेने प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि पेपरलेस करण्याच्या उद्देशाने डिजीटल निर्णय घेतला आहे. यानूसार आता सर्व विभागांनी आता ई-ऑफिस प्रणालीद्वारेच फाईल व टपाल व्यवहार केले जाणार आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी नुकतेच सर्व विभागांना निर्देश दिले आहेत.
या अनुषंगाने जिल्हा परिषद आस्थापनेतील सर्व अधिकारी व कर्मचा-यांचे शासकीय ई-मेल आयडी तयार करण्यात आले असून, यापुढे कार्यालयीन पत्रव्यवहार, टपाल तसेच फाईलची देवाण-घेवाण ई-ऑफिस प्रणालीद्वारे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ई-ऑफिस प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यापूर्वी जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकारी आणि कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गार्तील एकूण ८८१ कर्मचा-यांपैकी ७७२ जणांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच आतापर्यंत ५६ हजारांहून अधिक ई-फाईल्स तयार करण्यात आल्या असून ५२ हजार ४२१ टपालांचा ई-ऑफिसद्वारे व्यवहार करण्यात आला आहे.
ई-ऑफिस प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा कार्यक्रम प्रमुख कुलदीप जोशी समन्वयाची जबाबदारी सांभाळत आहेत. तर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनीही सर्व विभागप्रमुख व अधिका-यांना टपाल व पत्रव्यवहार ई-ऑफिसद्वारेच करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
















