31 C
Latur
Wednesday, May 22, 2024
Homeराष्ट्रीयसुप्रीम कोर्टाची नव्हे, संपूर्ण देशाची माफी मागा

सुप्रीम कोर्टाची नव्हे, संपूर्ण देशाची माफी मागा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जनतेची दिशाभूल करणा-या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना चांगलेच फटकारले. आता कोर्टाच्या कारवाईसाठी तयार राहा, तुम्ही येथे येऊन केवळ नावाला माफी मागत आहात, अशा शब्दांत कोर्टाने रामदेवबाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांच्यावर ताशेरे ओढले. एवढेच नव्हे, तर तुमच्या दिलगिरीवर आम्ही अजिबात समाधानी नाही. आमचीच नाही तर संपूर्ण देशाची माफी मागा, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने रामदेबाबा यांना फटकारले.

इंडियन मेडिकल असोसिएशनने नोव्हेंबर २०२३ मध्ये पतंजली आयुर्वेदविरोधात केस दाखल केली होती. अ‍ॅलोपथी डॉक्टरांविरोधात जाणूनबुजून चुकीचे दावे पतंजलीने आपल्या जाहिरातींमध्ये केले, असा आरोप आयएमएने केला होता. याबाबत पतंजलीने तात्काळ सर्व जाहिराती थांबवाव्यात, असे आदेश कोर्टाने फेब्रुवारीमध्ये दिले होते. आता पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.

तुमचा मीडिया विभाग तुमच्यापेक्षा वेगळा नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, तुम्ही असे का केले? गेल्या नोव्हेंबरमध्ये तुम्हाला इशारा देण्यात आला होता, तरीही तुम्ही पत्रकार परिषद घेतली. न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणात फक्त एकच प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे, तर दोन प्रतिज्ञापत्र दाखल करायला हवी होती. तुम्ही कायद्याचे उल्लंघन कसे केले? सर्वोच्च न्यायालयात हमीपत्र देऊनही तुम्ही कायद्याचे उल्लंघन केले. तुम्ही निकालासाठी सज्ज व्हा. कायद्यातील बदलांबाबत तुम्ही मंत्रालयाशी संपर्क साधला होता का, अशी विचारणा त्यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाने रामदेवबाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांना सांगितले की, तुम्हाला कोर्टात दिलेले वचन पाळावे लागेल, तुम्ही प्रत्येक मर्यादा मोडली आहे तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या प्रकरणाबाबत सांगितले की, जे घडले ते व्हायला नको होते.

न्यायालयाने नुकतेच बजावले होते समन्स
न्यायालयाने नुकतेच रामदेवबाबा आणि बाळकृष्ण यांना समन्स बजावले होते. न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले होते की, आयुर्वेदिक कंपनी पतंजलीने सतत दिशाभूल करणा-या जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल जारी केलेल्या अवमान नोटीसला उत्तर दिलेले नाही.

आश्वासनाचे उल्लंघन
२७ फेब्रुवारी रोजी खंडपीठाने आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली यांच्याविरुद्ध गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर दिलेल्या आश्वासनाचे उल्लंघन केल्याबद्दल अवमानाची कारवाई सुरू केली होती. न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांचाही खंडपीठात समावेश होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR