सोलापूर:सध्या रासायनिक खतांशिवाय शेती अशक्य बनली आहे. बदलते हवामान, शेतीत सेंद्रिय पदार्थाचे कमी झालेले प्रमाण, त्यातून जमिनीचा कमी झालेला पोत यामुळे शेतीतील पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. पण सन २०२२-२३ मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत खतांचा वापर २२.९१ टक्क्यांनी कमी झाला आहे.
कमी झालेला पाऊस, दुष्काळी स्थिती, सेंद्रिय शेतीकडे शेतकर्यांचा ओढा , कमी झालेला पाऊस यामुळे रासायनिक खतांचा वापर घटल्याचे दिसून येते. दुष्काळी जिल्हा अशी सोलापूरची ओळख आहे, पण उजनी धरण आणि भीमा, नीरा, सीना नदी, कालव्यांमुळे सिंचन क्षेत्र वाढल्याने या पट्ट्यात ऊस पिके अधिक घेतली जातात. बहुतांश ऊस उत्पादक ठिबकने रासायनिक खतांची मात्रा न देता पिकांमध्ये खतांचा भडिमार करतो. सन २०२०-२०२१ वर्षाच्या तुलनेत सन २०२१-२०२२ या वर्षात रासायनीक खतांचा वापर ४.४६ टक्क्यांनी वाढला होता. सन २०२१-२२ या वर्षात सोलापूर जिल्ह्यात ४८१ हजार मे. टन रासायनिक खत वापरले.
सन २०२२-२३ या वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यात तीन लाख ९१ हजार मे. टन, रासायनिक खतांचा वापर करण्यात आला.२२-२३ यावर्षी रासायनिक खतांच्या वापरात २२.९१ टक्के घट झाली. यात खरीप हंगामात ५०.२८ टक्के, तर रब्बी हंगामात ४९.७२ टके खते वापरली. गेल्यावर्षी खरीप व रब्बी हंगामात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतक-यांनी पेरणी करताना रासायनिक खतांचा वापर करणे टाळले. उसासाठी शेतकरी दरवर्षी तीन ते चारवेळा खतांचा डोस देतात. कमी पाऊस, कमी पाण्याची उपलब्धता यामुळे बहुतांश शेतकन्यांनी एक ते दोनच वेळा रासायनिक खतांचा डोस दिला. काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाळल्यामुळे रासायनिक खतांच्या वापरास फाटा दिल्याने रासायनिक खतांचा वापर घटल्याचे दिसून येते.