सांगली : महायुतीच्या मेळाव्यात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांची व्यथा मांडली. निवडणूक आली की भाजपला आमची आठवण येते, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी टीकेची झोड उठवली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने आतापासूनच जोरदार तयारी सुरू आहे. याचा पहिला टप्पा म्हणून आज प्रत्येक जिल्ह्यात महायुतीच्या घटक पक्षांचा मेळावा संपन्न होत आहे. सांगलीत देखील घटक पक्षांचा मेळावा संपन्न झाला. मात्र, या मेळाव्यात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या भावनांना वाट करून देत मित्र पक्ष असलेल्या भाजपला कोपरखळ्या मारत चांगलेच कान उपटले. मित्र पक्षांना निवडणुकीच्या तोंडावर बैठकीला बोलावले. शेवटी का होईना आमची आठवण झाली अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
सांगलीतील खरे क्लब हाऊसमध्ये महायुतीच्या घटक पक्षांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास भाजपचे खासदार संजयकाका पाटील, शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ आमदार अनिल बाबर, रयत क्रांती संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत, जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह अन्य पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, २०१४ पासून भाजपसोबत घटक पक्ष म्हणून आम्ही आहोत. २०१९ ला सरकार गेल्यानंतर छोटे घटक बाजूला गेले नाहीत, ते भाजपसोबत राहिले. त्याकाळात सत्ता नसताना आम्ही लढलो, असे सदाभाऊ खोत म्हणाले.
आम्ही घटक पक्ष चळवळीतील लोक आहोत. काही का असेना शेवटच्या काळात निवडणूक जवळ आल्यानंतर आमची आठवण झाली. आम्ही पण आता खुरपी घेऊन आलोय, तण काढतोय. पण आम्हाला उपेक्षित ठेवू नका. सत्तेच्या काळात घटक पक्षांना सन्मान दिला नाही, निधी दिला नाही. परंतु, बारीक बारीक घटक पक्षांना तुम्ही बोलवायला पाहिजे होते. आम्ही मागितलं की तुमचं रान उलटलं, असं करू नका. तुम्ही आम्हाला काही द्या अथवा न द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.