नागपूर : देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय माणूस यांना मारण्यासाठीच मोदी आणि राज्यातील महायुतीच्या सरकारने षडयंत्र रचले असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पुढच्या महिनाभरात टप्प्याटप्प्याने डिझेलचे भाव दीडशे रुपये झालेले दिसतील. १७० रुपये पेट्रोल झालेले दिसेल. देश खड्ड्यात टाकण्यासाठी चालवला जात आहे असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, इंधन तुटवडा नाही असे सरकार सांगत आहे. पण अनेक ठिकाणी विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. इंधनाचा तुटवडा आहे हे मान्यच केले पाहिजे. पुन्हा एकदा लॉकडाऊनचे दिवस येणार आहेत. जनतेने सरकारच्या विश्वासावर कुठेही पैसे गुंतवू नयेत. कारण तो वापस येणार नाही. सरकारने बँकासुद्धा रिकाम्या केल्या आहेत. जनतेने पैसे सुरक्षित ठेवले पाहिजेत. रिझर्व्ह बँकेतील पैसे सरकारने काढून घेतले आहेत. देश सर्वच बाजूने संकटात आहे.
एसआयआरच्या नावाने मतदारांची नावे कमी करतायत
विजय वडेट्टीवार म्हणाले की, लोकांचा जीव जातोय याकडे सरकारचे लक्ष नाही. ते पुन्हा एकदा धार्मिक तेढ निर्माण करतील आणि महत्त्वाच्या प्रश्नांवर पडदा टाकण्याचे काम करतील. सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते यावर आम्ही काही बोलणार नाही. पण निवडणूक आयोग भाजपचा दलाल म्हणून काम करत आहे. त्यांनी आमच्यावर हवी ती कारवाई करावी. एसआयआरच्या नावाने ज्या राज्यात सरकार येणार नाही त्या राज्यातील मतदारांची नावे कमी केली जात आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
सरकार भावना भडकवतेय
विजय वडेट्टीवार म्हणाले की, जनता महागाईने त्रस्त आहे आणि सरकार तणाव निर्माण करत आहे. महत्त्वाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष जाऊ नये यासाठी हे सर्व काही सुरू आहे. जनतेच्या भावना भडकवत लोकांना मारायचे, त्याचे राजकारण करायचे काम सरकारकडून सुरू आहे.
धार्मिक तेढ निर्माण करणे सत्ताधा-यांचा धंदा
विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशात धार्मिक तेढ निर्माण करणे हा सत्ताधा-यांचा धंदाच झाला आहे. सरकारने जाहीरनाम्यात याचा उल्लेख केला पाहिजे. यांनी संविधानाची भाषा करूच नये. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. सरकारमधील मंत्री हे असंवेदनशील आहेत. ते मंत्रिपदाच्या शपथेचा भंग करत आहे, त्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.
सरकारकडून आश्वासनांची धूळफेक
विजय वडेट्टीवार म्हणाले की, मनोज जरांगे सातत्याने आंदोलन करत आहेत, पण सरकार केवळ आश्वासनांची धूळफेक करत आहे. जीआर काढले जातात, मात्र अंमलबजावणी होत नाही. सरकारकडे जनतेला देण्यासाठी काहीही उरलेले नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
















