नागपूर : प्रतिनिधी
राज्यभरातील ४२ हजार कंत्राटी वीज कर्मचारी आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेच्या नेतृत्वात हा बेमुदत संप पुकारण्यात आला असून राज्यातील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे कंत्राटी कर्मचारी संपात सामील झाले आहेत. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये सुमारे ४२ हजार कंत्राटी कर्मचारी आहेत.
नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कर्मचा-यांनी आंदोलन पुकारले आहे. कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी वीज कर्मचारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात राज्यातील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांकरिता बेमुदत संपावर गेले. चंद्रपुरातही कंत्राटी वीज कर्मचारी आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत.
नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात ६६० मेगावॅटचे एकूण तीन संच आहेत. येथे रोज १९६० मेगावॅट विजेची निर्मिती होते. या संपात येथील सहा हजार कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले असल्याने पुढील काळात येथील वीजनिर्मितीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
या आहेत मागण्या
राज्यातील सुमारे ४२ हजार कंत्राटी कर्मचा-यांना वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर सामावून घ्या, हे कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नये आणि ३० टक्के वेतनवाढ देण्यात यावी, या कंत्राटी वीज कर्मचा-यांच्या मागण्या आहेत. या मागण्या मान्य होत नसल्याने या कंत्राटी कर्मचा-यांनी २८ आणि २९ फेब्रुवारीला लाक्षणिक संप केला होता आणि त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ५ मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता. त्यानुसार आता कर्मचा-यांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलन पुकारला आहे.