फाशीची शिक्षा कायम राहणार

नवी दिल्ली : मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी गळफास लावण्याची(फाशीची) सध्याची पद्धत रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार दि. १८ ऑगस्ट रोजी फेटाळून लावली. मात्र, या विषयावर अधिक वेदनामुक्त आणि आधुनिक पर्यायांचा विचार करण्यास केंद्र सरकार पूर्णपणे मोकळे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायाधीश विक्रम नाथ आणि न्यायाधीश संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम ३५४(५) च्या घटनात्मक वैधतेला या याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते. या कलमानुसार फाशीची शिक्षा झालेल्या कैद्याला तो मरेपर्यंत गळ्याला गळफास लावून टांगून ठेवण्याचे निर्देश दिले जातात.

याचिका फेटाळताना न्यायालयाने स्पष्ट केले की, भविष्यात वैद्यकीय किंवा वैज्ञानिकदृष्ट्या अशी कोणतीही ठोस माहिती समोर आली, ज्याद्वारे फाशीच्या पद्धतीवर पुनर्विचार करण्याची गरज निर्माण होईल, तर या मुद्द्याची घटनात्मक तपासणी करण्यास आजचा निर्णय अडसर ठरणार नाही. त्याचप्रमाणे, मृत्युदंडाच्या शिक्षेदरम्यान होणा-या वेदना कमीत कमी व्हाव्यात आणि मानवी प्रतिष्ठेचे जतन व्हावे, या घटनात्मक उद्दिष्टाचा पुनर्विचार करण्यासाठी केंद्र सरकारने तज्ज्ञ समितीमार्फत इतर पर्यायांची चाचपणी केल्यास त्यास न्यायालयाची कोणतीही हरकत नसेल.

ज्­येष्­ठ वकील मल्होत्रांची होती याचिका
ज्येष्ठ वकील ऋषी मल्होत्रा यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. गळफास लावून फाशी देण्याच्या पद्धतीमध्ये कैद्याला दीर्घकाळ अत्यंत वेदना आणि हाल सहन करावे लागतात, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. फाशीच्या ऐवजी घातक इंजेक्शन, गोळ्या झाडणे, विजेचा धक्का देणे किंवा गॅस चेंबर यांसारख्या पर्यायांचा अवलंब करावा. या पर्यायांमुळे फाशीची शिक्षा सुनावण्­यात आलेल्­या आरोपींचा अवघ्या काही मिनिटांत वेदनामुक्त मृत्यू होऊ शकतो, अशी मागणी त्यांनी केली होती.

दोन मुख्य मागण्या कोणत्या?
याचिकेत प्रामुख्याने दोन मुख्य मागण्या करण्यात आल्या होत्या. यामध्­ये पहिली मागणीही सीआरपीसीचे कलम ३५४(५) हे भेदभाव करणारे आणि संविधानाच्या कलम २१ (जीविताचा अधिकार) चे उल्लंघन करणारे असून, ज्ञान कौर प्रकरणातील घटनापीठाच्या निर्णयाशी विसंगत असल्याचे घोषित करावे. तर दुसरी मागणी ही सन्मानजनक पद्धतीने मृत्यू मिळणे हा संविधानाच्या कलम २१ अंतर्गत मूलभूत अधिकार घोषित करावा, अशी होती.

फाशी विरुद्ध इतर पर्यायाची तुलना
याचिकेत नमूद करण्यात आले होते की, गळफासाच्या प्रक्रियेत कैद्याला मृत घोषित करेपर्यंत ४० मिनिटांहून अधिक वेळ लागतो, तर गोळया झाडून मृत्यूदंडाची अंमलबजावणी केवळ काही मिनिटांत पूर्ण होते. तसेच प्राणघातक इंजेक्शन दिल्यास अवघ्या ५ मिनिटांत मृत्यू होतो. याचिकाकर्त्यांच्या मते, गळफासाची पद्धत रानटी, अमानुष आणि क्रूर आहे. संयुक्त राष्ट्र आर्थिक व सामाजिक परिषदेच्या ठरावाचा दाखला देत त्यांनी सांगितले की मृत्युदंड देताना कमीत कमी वेदना होतील अशाच पद्धतीने त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.

तज्ज्ञ समिती स्­थापन करण्­याची शिफारस
मार्च २०२३ मध्ये सुनावणीदरम्यान न्यायालयाने या विषयावर तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा विचार केला होता. न्यायालयाने भारताचे अ‍ॅटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी यांना फाशीमुळे होणारा त्रास, त्यासाठी लागणारा वेळ आणि उपलब्ध संसाधनांविषयीची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. मे २०२३ मध्ये अ‍ॅटर्नी जनरल यांनी न्यायालयाला माहिती दिली की, मृत्युदंडाच्या शिक्षेसाठी अधिक चांगला पर्याय उपलब्ध आहे का, हे ठरवण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची शिफारस त्यांनी सरकारला केली आहे.

अमेरिकेचे उदाहरण आणि लष्करी कायद्याचा संदर्भ
गेल्या वर्षी सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांनी अमेरिकेचे उदाहरण दिले. अमेरिकेतील ५० पैकी ४९ राज्यांनी फाशीऐवजी घातक इंजेक्शनचा पर्याय स्वीकारला आहे. किमान दोषी कैद्याला फाशी हवी की इंजेक्शन, असा पर्याय तरी दिला जावा. गळफासाच्या तुलनेत घातक इंजेक्शन ही जलद, मानवीय आणि अधिक सन्मानजनक पद्धत आहे असा युक्तिवाद त्यांनी केला होता. भारतीय सशस्त्र दलांच्या कायद्यांमध्ये असा पर्याय उपलब्ध असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. केंद्र सरकारने कैद्यांना शिक्षेचा पर्याय देण्याच्या सूचनेला विरोध केल्याबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती.

जल्लादांवरील मानसिक प्रभावाकडेही न्­यायालयाने वेधले लक्ष
सुनावणीदरम्यान न्यायाधीश संदीप मेहता यांनी गळफास देणा-या जल्लादांवर पडणा-या मानसिक प्रभावाकडेही लक्ष वेधले. अ‍ॅटर्नी जनरल व्यंकटरमणी यांनी शेवटी न्यायालयाला आश्वस्त केले की, केंद्र सरकार सर्वोच्च स्तरावर या विषयाची गंभीर दखल घेत असून काही समित्यांचे गठन करण्यात आले आहे. त्यानंतर जानेवारी महिन्यात न्यायालयाने या याचिकेवरील आपला निर्णय राखून ठेवला होता, आज तो जाहीर करण्­यात आला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26

Latest news