मुंबई: २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व इतिहास घडवणाऱ्या ‘देऊळ बंद’ चित्रपटानंतर, प्रेक्षक ज्या चित्रपटाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. ‘वटवृक्ष एण्टरटेन्मेंट’ निर्मित आणि प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा थरारक, भावनिक आणि डोळ्यात अंजन घालणारा अधिकृत ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. “आता परीक्षा देवाची…” या अत्यंत आव्हानात्मक आणि उत्कंठावर्धक टॅगलाईनसह येत असलेला हा भव्य चित्रपट येत्या २१ मे २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
थेट देवालाच आव्हान!
‘देऊळ बंद २’ चे कथानक सामाजिक वास्तव, श्रद्धा आणि मानवी संघर्ष या विषयांवर प्रकाश टाकणारे आहे. ट्रेलरनुसार, या भागामध्ये शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीतील ज्वलंत समस्या, त्यांचे आर्थिक संकट आणि शेतकरी आत्महत्या यांसारख्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यांना प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आले आहे. पहिल्या भागात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अध्यात्म यांमधील संघर्ष होता, तर या भागात थेट देवालाच त्याच्या अस्तित्वाची आणि कृपेची परीक्षा देण्याचे आव्हान देण्यात आले आहे.
मनाला भिडणारे दमदार संवाद
ट्रेलरमधील संवाद अत्यंत धारदार आणि थेट काळजाला भिडणारे आहेत. सोशल मीडियावर सध्या या संवादांची जोरदार चर्चा सुरू आहे.
“या देशात सगळं ओरिजिनल आहे, डुप्लिकेट फक्त शेतकरी!”
“रोज एक तरी आत्महत्या होणाऱ्या आमच्या या तालुक्यात पुढच्या आठ दिवसात एकही आत्महत्या झाली नाही पाहिजे… जर झाली तर माझं देऊळ बंद कायमचं!”
“माझ्या परीक्षेचं सोड, अख्खी शेतकरी जमात कोणत्या परीक्षेला बसलीये ते बघ…”
तगडी स्टारकास्ट
या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी हे पुन्हा एकदा ‘श्री स्वामी समर्थांच्या’ दैवी आणि भारदस्त भूमिकेत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेत्री स्नेहल तरडे एका खंबीर शेतकरी महिलेच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे, जी स्वामींची परीक्षा घेताना दिसेल. तर स्वतः प्रवीण तरडे ‘सदूशेठ’ नावाच्या १०० तोंडांच्या रावणाच्या भूमिकेत नकारात्मक शेड्स साकारताना दिसणार आहेत. याशिवाय चित्रपटात महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड, रमेश परदेशी, ओम भूतकर आणि संस्कृती बालगुडे यांसारखे अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळतील. चित्रपटाची भव्य निर्मिती कैलास वाणी, सौ. जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी – सूर्यवंशी यांनी केली आहे. आत्महत्या करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत, तर बदलत्या परिस्थितीनुसार शेतीत बदल करण्याची गरज आहे, असा ठाम संदेश या चित्रपटातून दिला जाणार आहे. स्वामी भक्तीचा गजर आणि सामाजिक प्रबोधन यांचा अनोखा मिलाफ असलेला हा चित्रपट उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कौटुंबिक प्रेक्षकांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे.
















