औसा : संजय सगरे
‘सबका साथ सबका विकास’ या नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील देश विकासात योजना तयार करताना व त्याची अंमलबजावणी करताना जात-धर्म हा निकष लावण्यात आला नाही. देशातील गरिब कुटुंबाना तो कोणत्याही जाती व धर्माचा असो त्याला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मिळाले, मोफत धान्य मिळाले कोरोना काळात मोफत लस मिळाली देश डोळ्यांसमोर ठेवून गेल्या दहा वर्षांपासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केवळ देशहिताचे निर्णय घेतले असून आता तुम्हीही मत देताना जात – धर्म बघू नका देशाच्या भवितव्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना निवडून द्या असे आवाहन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले आहे.
धाराशीव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ औसा शहर येथील आझाद चौक व लामजना येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार अभिमन्यू पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने,भाजपचे जिल्हा प्रभारी संतोषअप्पा मुक्ता, माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अफसर शेख, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, माजी नगराध्यक्ष किरण उटगे, सुनील उटगे, बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, काकासाहेब मोरे, राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष दत्तात्रय कोळपे, शहराध्यक्ष प्रदिप मोरे, युवराज बिराजदार, अक्रम पठण, इम्रान सय्यद, बंडू कोद्रे, फिरोज पठाण, माधव परिहार, नसीर कुरेशी, शिव मुरगे, पापामिया पटेल, बालाजी शिंदे, महेश सगर, बालाजी पाटील, सत्तार मिर्झा, नजीर पटेल, गणेश बिराजदार आदीसह महायुती चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी पाशा पटेल पुढे म्हणाले, आमदार अभिमन्यू पवार यांनी या चार वर्षांच्या काळात मतदारसंघातील विकासासाठी अडीच हजार कोटींचा निधी खेचून आणला. शहरातील पाणीपुरवठा योजनांसाठी भरघोस निधी मंजूर करून घेतला यामुळे औसा शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटला, रस्ते व इतर कामासाठी मोठा निधी उपलब्ध होत असताना आता औशाला रेल्वे व केंद्रातून मोठ्या योजना, उद्योग येण्यासाठी महायुतीच्या उमेदवारला खासदार म्हणून दिल्लीला पाठवणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदारांनी एक होवून औशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुती च्या उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांना भरघोस मताधिक्य द्यावे आणि मला विश्वास आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य औसा मतदारसंघातून जनता मिळवून देईल. दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशात गरिब कल्याणकारी योजना सुरू केल्या देशातील प्रत्येक गरिब कुटुंबाना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी जात – धर्म न बघता योजना दिल्या देश एका उंचीवर घेऊन जाताना शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी अनेक योजना आखल्या त्या अंमलात आणल्या. सर्वधर्मीय समभाव याच संकल्पनेतून देश विकास साधत असताना अंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला सन्मान मिळवून देण्याचे काम या सरकारने केले आहे.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सर्वच स्तरावर विकासाची कामे हाती घेण्यात आले आहेत. सरकारने पर्यावरण संवर्धन च्या व मानव जातीच्या रक्षणासाठी जगातील पहिले टास्क फोर्स महाराष्ट्रात तयार झाले असून याची मोठी जबाबदारी राज्यानी मला दिल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.