नवी मुंबई : प्रतिनिधी
वातावरणातील बदलामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. आवकमध्ये चढ-उतार होत असल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये फ्लॉवर, वाटाणा, दुधी भोपळ्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे.
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी ६७७ वाहनांमधून ३ हजार टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये ४ लाख ७२ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. मागील काही दिवसांमध्ये आवकमध्ये चढ-उतार होत आहे. राज्यात दिवसा प्रचंड ऊन व रात्री थंडी असे वातावरण आहे. उन्हामुळे भाजीपाला पिकावर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळेही उत्पादन कमी होत आहे. या सर्वांचा मुंबईतील आवकवर परिणाम होत असून, बाजारभाव वाढू लागले आहेत.
भाजीपाला होतोय खराब
किरकोळ मार्केटमध्येही भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे बाजारभावही वाढत आहेत. किरकोळ मंडईत दुधी ६० रुपये किलो, फरसबी ७० ते ८०, फ्लॉवर ६० ते ८०, गाजर ४० ते ६०, कारली ५० ते ६०, ढोबळी मिर्ची ८० ते १००, शेवगा शेंग ८० ते १००, वाटाणा ६० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे.