मुंबई : एकनाथ शिंदे यांना स्वत:ला मराठा मॅन म्हणून प्रस्थापित करण्याची अतिशय घाई झाली आहे. त्या घाईतूनच त्यांनी अगतिकतेने काही निर्णय घेतले. दुसरीकडे, शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील छुपा राजकीय संघर्ष आता टोकाला गेला असून फडणवीस हे शिंदेंवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नसल्याचे टोला शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, सात-आठ महिन्यांपूर्वी आझाद मैदानावरून आंदोलक परतले, तेव्हाच सरकारच्या नियतीवर शंका उपस्थित केली होती. शिंदे जर आरक्षणाबाबत काही भूमिका घेणार असतील, तर फडणवीस ती घेऊ देतील का? आणि फडणवीसांच्या मंजुरीवरच शिंदेंची भूमिका अवलंबून असेल, तर त्यांनी मराठा समाजाला पोकळ शब्द दिलाच का? या दोन नेत्यांच्या राजकीय ईर्षेत आणि कुरघोडीत मधल्यामध्ये गरीब मराठा समाजाचा जीव जात आहे.
रील लाईफपेक्षा रिअल लाईफवर लक्ष द्या
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना अंधारे म्हणाल्या की, रिअल लाईफ आणि रील लाईफ यातील फरक फडणवीसांसारख्या अभ्यासू नेत्याला कळायला हवा. पडद्यावरील ‘रामायण’ चित्रपटाला ऑस्कर मिळावा म्हणून प्रयत्न करण्यापेक्षा प्रत्यक्ष आयुष्यात आणि प्रशासनात उत्तम कामगिरी करून दाखवणे गरजेचे आहे, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
दानपेटी चोरीवरून गृहमंत्र्यांना सवाल
प्रभू श्रीरामाच्या मंदिरातील दानपेटी चोरीच्या घटनेचा उल्लेख करत सुषमा अंधारे म्हणाल्या की, ज्या प्रभू श्रीरामाच्या जीवनावर रामायण आधारित आहे, त्यांच्याच मंदिराच्या दानपेटीतून चोरी होणे अत्यंत गंभीर आहे. या चोरीतील मुख्य आरोपींवर कधी गुन्हे दाखल होणार? यावर गृहमंत्री काहीच बोलत नाहीत. चित्रपटाला पुरस्कार मिळण्यावर बोलणे ही बॉलिवूड स्टाईल भाषा झाली, गृहमंर्त्यांनी आणि शासनाने चोरीच्या या गंभीर प्रकरणावर स्पष्ट उत्तर दिले पाहिजे.
















