जालना : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये निर्णायक बैठक बोलावली होती. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान, फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे यांनी थेट हिंदीमधून भाषण केले. ‘फडणवीस साहाब सब बिगड गये है तुम्हारे उपर, तुम्ही नुसते बडे बडे दिखते, सबके सब गये तुम्हारे पीछे से, मागून पुढे गये’ असे म्हणत जरांगे यांनी हिंदीतून फडणवीसांवर निशाणा साधला.
यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, बँड वाजवणा-यावर गुन्हे दाखल झाले, ज्यांनी साखळी उपोषण केले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, आमरण उपोषण करणा-यांवर गुन्हे दाखल, ज्यांनी रॅली काढली त्यांच्यावर गुन्हे दाखल, कुठे पाप फेडणार आहात तुम्ही. एवढी समाजाची नाराजी अंगावर ओढून घेण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गरज नव्हती
. या समाजाने पिढ्यान् पिढ्या तुमच्या अंगावर गुलाल टाकला आहे. सगळ्या पक्षातील नेते आपल्या लेकरांसाठी एकत्र आले मग ते सत्ताधारी असोत की विरोधक असतील. फडणवीसांची दुसरी एक किमया आहे. यवतमाळचे एसपी महिलांना बसवून ठेवत आहेत. अंतरवालीच्या बैठकीला येण्यासाठी त्यांना थांबवले जात आहे. पण मराठे थांबणार नाहीत, आता तुम्हाला घरी बसवतील असे जरांगे म्हणाले.
गोरगरीब लेकरांवर गुन्हे दाखल
मराठ्यांना वेड्यात काढण्यासाठी फक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचा कोणताही फायदा समाजाला झाला नाही. सरकारने गुन्हे मागे घेण्याचे सांगितले होते, उलट गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून आज गावागावांत गोरगरीब लेकरांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. मराठ्यांनी आंदोलनापासून लांब जावे यासाठी गुन्हे दाखल केले जात आहेत. फडणवीस यांनी जेवढ्या ताकदीने गुन्हे दाखल केले, तेवढ्या ताकदीने मराठा आज एकत्र आला आहे. तुमचं आमचं शत्रुत्व नव्हतं, असण्याचं कारण देखील नाही. तुम्ही सत्तेचा गैरवापर सुरू केला आणि गोरगरिबांच्या पोरांना गुतवायला सुरुवात केली. त्यामुळे मराठ्यांची लाट उसळली, असेही जरांगे म्हणाले.