पुणे : ‘एल निनो’च्या शक्यतेमुळे राज्यातील शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या उपाययोजना, त्यांची अंमलबजावणी आणि सर्वसमावेशक मदतीची अपेक्षा शेतक-यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ‘शिवार फाऊंडेशन’तर्फे शेतक-यांच्या मदतीसाठी तयार करण्यात आलेल्या हेल्पलाईनवर येणा-या ‘कॉल’च्या विश्लेषणात शेतक-यांची ही चिंता व्यक्त झाली आहे.
सहा महिन्यांपूर्वीचा महापुराचा फटका, आता दुष्काळाची शक्यता, यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून मदतीसाठी संपर्क करणा-या शेतक-यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण शिवार फाऊंडेशनकडून नोंदविण्यात आले. गेल्या चार महिन्यांत ‘शिवार हेल्पलाईन’वर संपर्क करणा-या शेतक-यांमध्ये ६२ टक्क्यांनी वाढ झाली असून एप्रिल महिन्यात १ हजार ५९८ शेतक-यांनी मदतीसाठी संपर्क केला आहे. जानेवारी महिन्यात ही संख्या ९८२ इतकी होती. तर फेब्रुवारी महिन्यात १ हजार १९५, मार्चमध्ये १ हजार २७६ शेतक-यांनी दुष्काळाबद्दल चिंता व्यक्त केल्याची माहिती
‘फाऊंडेशन’कडून देण्यात आली.
‘शिवार फाऊंडेशन’चे प्रमुख विनायक हेगाना म्हणाले, ‘काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतक-यांना नुकतेच झोडपले. त्यामुळे अजूनही आर्थिक घडी विस्कळीत आहे. त्यात ‘एल निनो’मुळे निर्माण झालेली दुष्काळाची शक्यता शेतक-यांना आर्थिक, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या खचवणारी आहे. त्याला आधाराची, विश्वासाची गरज आहे. त्यासाठी शिवार हेल्पलाईनच्या माध्यमातून काम करत आहोत. या हेल्पलाईनवर संपर्क करणा-या शेतक-यांना समुपदेशनाबरोबरच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी उपाय सुचवले जातात, त्यांना मदत केली जाते. त्यासाठी ८९५५७ ७१११५ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहनही हेगाना यांनी केले.
‘एल निनो’ म्हणजे काय ?
‘एल निनो’ ही पॅसिफिक महासागराशी संबंधित नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. मध्य आणि पूर्व पॅसिफिकमधील समुद्राच्या पाण्याचे तापमान जेव्हा सामान्यपेक्षा जास्त वाढते, तेव्हा वातावरणातील वा-यांचे प्रवाह, ढगांची निर्मिती आणि पावसाचे चक्र बदलते. हा बदल दिसायला लहान असला, तरी त्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या हवामान प्रणालीवर होतो. काही ठिकाणी दुष्काळ, तर काही ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण होते.
कोणत्या महिन्यात किती कॉल
महिना संपर्क करणारे शेतकरी
जानेवारी ९८२
फेब्रुवारी १,१९५
मार्च १,२७६
एप्रिल १,५९८
















