माहूर (इलियास बावानी) : माहूर-धनोडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१एवर चार रानडुकरे मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेला तीन दिवस उलटल्यानंतरही दोन मृत रानडुकरे घटनास्थळीच पडून असून त्यातून तीव्र दुर्गंधी पसरत असल्याने वाहनधारक, भाविक आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, उर्वरित दोन रानडुकरे अचानक गायब झाल्याने या प्रकरणात अपघात झाला की शिकारीचा प्रकार घडला, याबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री रेणुका देवी महाविद्यालय ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता कार्यालयादरम्यान, डम्पिंग ग्राउंडकडे जाणाऱ्या रस्त्यालगत चार रानडुकरे मृत अवस्थेत आढळली होती. मात्र, काही दिवसांत त्यापैकी दोन रानडुकरे रहस्यमयरीत्या गायब झाली, तर उर्वरित दोन मृतदेह जागेवरच सडत पडल्याने परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे.
या मार्गावरून दररोज हजारो वाहनधारक तसेच श्री रेणुकामाता मंदिराकडे जाणारे भाविक प्रवास करतात. दुर्गंधीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून संबंधित मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यात वन विभाग आणि नगरपंचायत प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अपघात की शिकारीचा प्रकार?
चारही रानडुकरांचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. महामार्गावर वाहनांच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी एक शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे दोन मृतदेह गायब झाल्यामुळे शिकारीनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असावा, अशीही चर्चा परिसरात रंगू लागली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वन्यजीव संरक्षणावर प्रश्नचिन्ह
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, माहूर परिसरातील जंगलात उन्हाळ्यात पाण्याअभावी रानडुकरे, ससे, कोल्हे यांसारख्या अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या वेळीही वन विभागाने पुरेशी उपाययोजना केली नसल्याचा आरोप करण्यात आला होता. आता महामार्गावर मृतावस्थेत आढळलेल्या रानडुकरांच्या घटनेनंतर वन्यजीव संरक्षणाच्या यंत्रणेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांचा आरोप आहे की, वन्यप्राण्यांचे संरक्षण, बचावकार्य आणि मृत वन्यप्राण्यांची तातडीने विल्हेवाट लावणे याबाबत संबंधित यंत्रणा निष्क्रिय असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शासनाकडून वन्यजीव संवर्धनासाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या निधीचा प्रभावी वापर होत आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
त्वरित कारवाईची मागणी
महामार्गालगत पडून असलेल्या मृत रानडुकरांमुळे दुर्गंधीबरोबरच आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने मृत प्राण्यांची विल्हेवाट लावावी, त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करावे आणि अपघात अथवा शिकारीचा प्रकार असल्यास दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारक, भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेबाबत वन विभागाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसून, चौकशीनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
















