टेंभुर्णी (सिद्धेश्वर शिंदे) : सोलापूर जिल्ह्याची भाग्यवरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरणासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यासह उजनी धरणाच्या वरच्या भागातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नद्या आणि धरणांमधील पाण्याची आवक वेगाने वाढत आहे. दौंड येथून उजनी धरणात सुमारे २७ हजार ८४६ क्युसेक्स वेगाने पाणी येत असून, बंडगार्डन येथील विसर्ग तब्बल ४५ हजार ८३ क्युसेक्सपर्यंत वाढला आहे.
खडकवासला, पवना, कासारसाईसह विविध धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने आगामी काळात दौंड येथील विसर्गात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उजनी धरणावर अवलंबून असलेल्या सोलापूर, पुणे आणि परिसरातील शेतकरी, नागरिक आणि विविध पाणीपुरवठा योजनांसाठी ही अत्यंत दिलासादायक बाब ठरत आहे.
धरणसाखळी क्षेत्रात एका दिवसात २३१० मिमी पाऊस
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणसाखळी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. उजनीच्या वरच्या बाजूस असलेल्या १९ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मिळून एका दिवसात तब्बल २३१० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर उजनी धरणाच्या थेट पाणलोट क्षेत्रात १० मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. याशिवाय नीरा खोऱ्यातील गुंजवणी, वीर, नीरा देवघर, नाझरे आणि भाटघर धरणांच्या परिसरातही जोरदार पाऊस झाला आहे. या धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात ४०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने नीरा खोऱ्यातील पाणीसाठ्यातही वाढ होण्याची अपेक्षा आहे.
दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे पुनरागमन
पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना होत आला असतानाही पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले होते. अनेक भागांत खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या, तर पाण्याअभावी उभी बागायती पिकेही संकटात सापडली होती. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मागील सहा ते सात दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर डोंगर परिसर, मावळ, लोणावळ्याचा पश्चिम भाग आणि उजनी धरणाच्या विस्तृत पाणलोट क्षेत्रात पाऊस सक्रिय झाला आहे. या पावसामुळे नद्या, नाले आणि ओढ्यांना पाणी येण्यास सुरुवात झाली असून, उजनीकडे येणारा प्रवाह सातत्याने वाढत आहे.
१९ धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
उजनी धरणाच्या वरच्या भागातील धरणांमध्येही पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. खडकवासला, पानशेत, चासकमान, भामा आसखेड, आंद्रा आणि मुळशीसह विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. या धरणांमधील पाणीसाठा वाढत असल्यामुळे आवश्यकतेनुसार विसर्ग करण्यात येत आहे. हा प्रवाह पुढे नद्यांमार्फत भीमा नदीत येत असल्याने दौंड येथील विसर्गात सातत्याने वाढ होण्याची शक्यता आहे.
इंद्रायणी नदीतही पाण्याची आवक वाढली
लोणावळ्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे इंद्रायणी नदीतही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे भीमा नदीच्या प्रवाहात आणखी भर पडणार आहे. त्याचबरोबर भीमाशंकरच्या डोंगराळ परिसरातही पाऊस सक्रिय झाला आहे. हा पाऊस आगामी तीन ते चार दिवस कायम राहिल्यास दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मोठी वाढ होऊ शकते. सध्या हजारो क्युसेक्समध्ये असणारा प्रवाह पावसाची तीव्रता कायम राहिल्यास मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बंडगार्डनचा विसर्ग ४५ हजार क्युसेक्सच्या पुढे
उजनीच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे बंडगार्डन येथील विसर्गात झालेली प्रचंड वाढ. बंडगार्डनचा विसर्ग सुमारे ४५ हजार ८३ क्युसेक्सपर्यंत पोहोचला आहे. वरच्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने या विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या कालावधीतही विसर्गात लक्षणीय वाढ होऊ शकते, असे संकेत धरण प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. उजनीकडे येणाऱ्या पाण्यात आगामी काळात कित्येक हजार क्युसेक्सने वाढ होण्याची शक्यता असल्याचे धरण नियंत्रण विभागाचे अभियंता प्रशांत माने यांनी सांगितले.
उजनीच्या पाणीसाठ्यात तासागणिक वाढीची अपेक्षा
५ जुलै रोजी उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा उणे पातळीवर होता. मात्र दौंड येथून २७ हजार क्युसेक्सपेक्षा अधिक वेगाने पाणी येत असल्याने आता धरणाच्या एकूण पाणीसाठ्यात प्रत्येक तासाला वाढ दिसून येण्याची अपेक्षा आहे. पावसाळ्याचे अद्याप अडीच ते पावणेतीन महिने शिल्लक आहेत. उजनीच्या वरच्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू राहिल्यास उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने सुधारणा होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कायम राहिला आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथा, भीमाशंकर, मावळ, लोणावळा परिसरासह भीमा खोऱ्यात चांगला पाऊस झाला तर यंदाही उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची आशा निर्माण झाली आहे.
उजनी धरणाची सध्याची स्थिती
उजनी धरणाची एकूण पाणीपातळी ४८८.७६० मीटर आहे. धरणात एकूण १३९९.२७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. उपयुक्त साठा उणे ४०३.५४ दशलक्ष घनमीटर आहे. धरणातील एकूण पाणीसाठा ४९.४२ टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा उणे १४.२५ टीएमसी आहे. उपलब्ध माहितीनुसार उपयुक्त साठ्याची टक्केवारी उणे २६.६० टक्के आहे. दौंड येथून २७ हजार ८४६ क्युसेक्स, तर बंडगार्डन येथून ४५ हजार ८३ क्युसेक्सचा प्रवाह सुरू आहे.
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
उजनी धरणावर सोलापूर जिल्ह्यातील शेती, पिण्याच्या पाण्याच्या योजना, उद्योग आणि विविध उपसा सिंचन योजना मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने आणि दौंडचा विसर्ग वाढल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने उजनीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार हजेरी लावल्याने आगामी काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. घाटमाथा आणि भीमा खोऱ्यात पावसाची अशीच धुवाधार बॅटिंग सुरू राहिल्यास उजनीच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होऊन सोलापूर जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे संकट दूर होण्यास मोठी मदत होऊ शकते.
















