नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी संसद मार्ग पोलिस ठाण्याबाहेर साडे सात तास केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर, पेलेट गन गोळीबार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी शुक्रवार दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी अज्ञाताविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
२० जुलै रोजी झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चादरम्यान पेलेट गन गोळीबार प्रकरणी राहुल गांधींनी एफआयआर दाखल करण्याची मागणी करत शुक्रवारी दुपाारी १२च्या सुमारास ठिय्या आंदोलनास सुरूवात केली होती. पोलिसांनी सुरुवातीला एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केल्यानंतर राहुल गांधींनी पेलेट गनने गोळीबार केल्याने जखमी झालेल्या १९ वर्षीय तरुण आणि त्याच्या कुटुंबियांसह डीसीपी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली.
काँग्रेस नेत्यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी नारेबाजी सुरू केली असून यामुळे संसद मार्ग पोलिस ठाण्यातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. येथे रॅपिड अॅक्शन फोर्सलाही तैनात करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे राहुल यांनी यापूर्वी पावसाळी अधिवेशनात संसदेवरील मोर्चात पॅलेट गनचा वापर करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या स्पष्टीकरणाचीही मागणी केली होती. मात्र, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पोलिसांकडून गोळीबार झाला नसल्याचा दावा केला होता. नीट पेपरफुटी व परीक्षांमधील अनियमितता या मुद्द्यांवरून कॉकरोच जनता पार्टीने २० जून रोजी जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू केले होते. या काळात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही उपोषण केले. २० जुलै रोजी झालेल्या संसद चलो (संसदेकडे कूच) आंदोलनात पोलिस आणि आंदोलक यांच्यात संघर्ष झाला होता. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर २५ जुलै रोजी हे आंदोलन समाप्त झाले.
राहुल गांधींचा निर्धार
एफआयआर दाखल न करण्याबाबत वरिष्ठ अधिका-यांकडून सूचना मिळाल्याचा दावा पोलिस करीत असताना एफआयआर दाखल होईपर्यंत तिथून न हलण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. दरम्यान राहुल यांच्यासोबत प्रियंका गांधी, अधीर रंजन चौधरी, सलमान खुर्शीद आणि जयराम रमेश हे देखील उपस्थित होते.
दखलपात्र गुन्ह्याची नोंद बंधनकारक : राहुल गांधी
राहुल गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोछाब यांनी १४ ऑगस्ट रोजी दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली होती, परंतु पोलिसांनी या प्रकरणातील तपास अधिका-याची कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. लोछाब यांनी १७ ऑगस्ट रोजी ईमेल आणि फोनद्वारे पुन्हा पाठपुरावा केला. मात्र, तरीही तपास अधिका-याचा कोणताही तपशील देण्यात आला नाही, तसेच तक्रार स्वीकारल्याची पोचपावतीही देण्यात आली नाही असे गांधी म्हणाले. हा एक दखलपात्र गुन्हा असल्याने एफआयआर नोंदवणे बंधनकारक आहे, मात्र दिल्ली पोलिस तसे करत नाहीत असा आरोपही गांधी यांनी केला.
















