बारामती : देशात लोकसभा निवडणुकांची जोरदार रणधुमाळी सुरू आहे भाजपने राज्यातील पहिल्या २० उमेदवारांची घोषणाही केली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बैठकांचे सत्र आहे, तर दुसरीतडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नेत्यांची घरवापसी सुरू आहे. पारनेरचे आमदार निलेश लंकेंनी आणि बीडचे बजरंग सोनवणे यांनी प्रवेश केला. दरम्यान, आज शरद पवार यांनी आणखी काही नेते काही दिवसातच प्रवेश करणार आहेत असे संकेत दिले आहेत.
बीडमधील ज्योती मेटे यांच्याबाबत अजून काही ठरलेले नाही, शिवसेनेसोबच चर्चा करुन त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेण्यात येणार आहे. आमच्या पक्षात आणखी इनकमिंग होईल, आमच्या विरोधकांच्या उमेदवारांची यादी जाहीर होऊदे, तुम्हाला आणखी काही नेते आमच्याकडे येत असल्याचे दिसतील, दिसत आहे त्यापेक्षा अधिक लोक आमच्यासोबत येणार आहेत, असे संकेत शरद पवार यांनी दिला, यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. राज्यातील प्रमुख नेत्यांवर ईडी सारख्या एजन्सीकडून कारवाई केली जात आहे. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांवर आधी अशीच कारवाई केली.
त्यांच्यावर आरोप करुन त्यांची चौकशी करुन तुरुंगात टाकले. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करुन त्यांना आता तुरुंगात टाकले आहे. प्रत्येक राज्यामध्ये मद्य धोरण असते, मंत्रिमंडळाला पॉलिसी तयार करण्याचा अधिकार असतो. कुठल्याही गोष्टीचे धोरण करण्याचा अधिकार असतो. त्या पॉलिसीमध्ये चुकले असेल तर निवडणुकीत प्रश्न उपस्थित केले पाहिजेत, असे न करता तेथील मंत्र्यांना अटक केली आता काल राज्याच्या प्रमुखाला अटक केली. धोरण ठरवली त्यासाठी अटक करणे हे चुकीचे आहे, सत्येचा गैरवापर करणे सुरू आहे. आज चिंतेची अवस्था झाली आहे, असा आरोपही शरद पवार यांनी केला आहे.
मी कुठूनही लढणार नाही
गेल्या दोन दिवसांपासून खासदार शरद पवार निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ते सातारा, माढ्यातून लढणार असे बोलले जात आहे. यावर बोलताना पवार म्हणाले, मी कोणतीही निवडणूक लढणार नाही. मी निवडणुकीला उभा राहणार नाही असेही पवार म्हणाले.