मुंबई : मराठा आरक्षण विषयक राज्य सरकारच्या अधिसूचनेवर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘‘सरकारने सगेसोय-यांबाबत काढलेली अधिसूचना अंतिम निर्णय नाही’’, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ‘‘अधिसूचनेवर सरकारने हरकती आणि सूचना मागविल्या आहेत’’, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. एकदा कायदा पारित होऊ द्या, मग व्यवस्थित होणार, असं देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाल.
चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
अधिसूचनेमध्ये काही आक्षेप आहेत. अधिसूचना अंतिम व्हायची आहे. अधिसूचनेतील आक्षेप घेताना, भुजबळ साहेब, सर्वांनी घेऊन, त्यानंतर अंतिम होण्यापूर्वी त्या अधिसूचनेला काही दुरुस्त्या करायच्या असतील तर सरकारचा अधिकार आहे. त्यामुळे त्याबद्दलची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘‘त्यांना जिथे आंदोलन करायचं आहे ते करावं. आम्हाला काय अडचण नाही. त्यांची भूमिका बदलणार नाही. सगळं व्यवस्थित होईल. एकदा कायदा पारित होईपर्यंत थांबा. सगळं व्यवस्थित होईल’’, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे.